अक्षररंग

तिचं बाई होत जाणं

तशी उंबरठा ओलांडून, केव्हाच बाहेर पडली आहे ती, फिरवूनही आणलं आहे तिला...

नवशक्ती Web Desk

काव्यकट्टा

नीरजा

तशी उंबरठा ओलांडून

केव्हाच बाहेर पडली आहे ती.

फिरवूनही आणलं आहे तिला

अज्ञाताच्या प्रदेशातून

तिच्या इवल्याशा बोटाला धरून.

चेहरा नसलेल्या बायकांच्या इतिहासाचा

रंगहीन तुकडा

तिच्या हातावर ठेवताना

ठरवून सांगितले पराक्रम एकादोघींचे.

तेव्हा खरं तर तिला जाणून घ्यायचं होतं

जगणं रंगहीन चेहर्‍यांचं.

एखादी बाई देशाची पंतप्रधान होण्यानं

नेमका काय फरक पडतो बायकांच्या जगण्यात?

यासारखे प्रश्नही पडत होते तिला.

स्वातंत्र्य मिळायलाच हवं तुला

असं म्हणताना,

तिच्या पायात बांधलेला अदृश्य धागा

तिला जाणवत राहतो सतत.

मग धुमसत राहते ती आतल्या आत

त्या पाल्याचा ताण सहन करत

तेव्हा वाटतं

सोडून द्यावं तिला मोकळं

या अरण्यात.

ओळखू दे तिलाच

मुखवट्यांच्या जंगलात दडलेल्या श्वापदांना

होऊ दे ओळख स्वतःची आणि जगाचीही;

पण उगीचच आठवत राहतो

योनिशुचितेच्या कल्पनांनी भरलेला

बाईचा भग्न भूतकाळ.

शेवटी मुलगी आहे

असंही येत राहतं मनात राहून राहून.

आई आणि बाई असण्यातला हा फरक

जाणवत राहतो तीव्रतेनं.

आई का असते पारंपरिक

आणि बाई स्वैर मोकळी

आकाशाला गवसणी वगैरे घालण्याची भाषा बोलणारी?

तिचं हळूहळू बाई होत जाणं

माझ्यातल्या आईपणाला ओलांडून

आता जाणून घ्यायला हवं मला,

कदाचित माझी मलाच ओळख होईल नव्यानं

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Navi Mumbai : एलपीजी टंचाईमुळे सानपाडा गॅस एजन्सीसमोर नागरिकांची झुंबड; सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा; Video

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती