नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘जीएसटी’त मोठे बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. नवीन प्रस्तावात जीवनावश्यक वस्तूंवर ५ टक्के व १८ टक्क्यांचे जीएसटी दर असतील, तर लक्झरी व मद्य, तंबाखू, अमली पदार्थ, जुगार आदींवर ४० टक्के विशेष कर लावला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
सध्याच्या १२ टक्क्यांच्या जीएसटी टप्प्यात येणाऱ्या ९९ टक्के वस्तू आता पाच टक्क्यांच्या टप्प्यात टाकल्या जातील, तर २८ टक्क्यांच्या टप्प्यातील ९० टक्के वस्तू आता १८ टक्क्यांच्या टप्प्यात टाकल्या जातील. या बदलामुळे कररचना सरळ होईल व ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे. ‘जीएसटी’चे टप्पे बदलल्याने वस्तूंचा खप वाढेल. त्यामुळे कर कपातीमुळे होणाऱ्या महसुलाची भरपाई होईल, असे सूत्रांनी सांगितले.
पेट्रोल उत्पादने, हिरे, रत्ने ‘जीएसटी’बाहेरच
पेट्रोलियम उत्पादनांना ‘जीएसटी’बाहेरच ठेवले जाईल. त्यांच्यावर विविध प्रकारचे कर लागतील. हिरे व महागड्या रत्न आदी निर्यातीभिमुख विभागातील करांचे टप्पे पूर्वीप्रमाणेच राहतील, असे सूत्रांनी सांगितले.