रिओ-डी-जनिरो : ब्राझिलमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे किमान २७ लोकांचा मृत्यू झाला आणि १६०० हून अधिक बेघर झाले आहेत.
सोमवारी रात्रीपासून ब्राझिलच्या ६० हून अधिक शहरांमध्ये वादळाचा तडाखा बसला आहे. रिओ ग्रांदे दो सुल राज्य आणि रिओ पारडो खोरे या प्रदेशांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. देशाच्या मध्य-दक्षिण प्रदेशात अधिक मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाने पुढीस ७२ तासांसाठी धोक्याचा इशारा दिला असून नागरिकांना अन्न आणि पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. बचाव आणि मदत पथके युद्धपातळीवर काम करत आहेत.
नद्या ओसंडून वाहू लागल्याने अडकून पडलेली अनेक कुटुंबे घरांच्या छप्परांवर चढून मदतीसाठी याचना करत होती. सुमारे ५० हजार रहिवासी असलेल्या मुकुममधील एका घरात १५ मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. अनेक जण विजेच्या धक्क्याने मरण पावले. शहरी भागात इमारतींचे आणि ग्रामीण भागात शेतीचे बरेच नुकसान झाले आहे. विजेचे खांब वाहून गेल्याने अनेक भागांत अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.