आरोग्यदायी जीवनशैलीकडे लोकांचा कल वाढत असताना पारंपरिक मातीच्या भांड्यांची लोकप्रियताही पुन्हा वाढू लागली आहे. मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न चविष्ट तर लागतेच, शिवाय त्यातील नैसर्गिक पोषक घटकही अधिक प्रमाणात टिकून राहतात, असे मानले जाते. मात्र ही भांडी पहिल्यांदाच वापरताना योग्य काळजी घेतली नाही, तर ती तडकू किंवा खराब होऊ शकतात. त्यामुळे मातीच्या भांड्यांचा वापर सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.
नवीन भांडे थेट गॅसवर ठेवू नका
बाजारातून आणलेले नवीन मातीचे भांडे लगेच वापरण्याची चूक करू नका. मातीच्या भांड्यांमध्ये नैसर्गिक छिद्रे असतात. त्यामुळे त्यांना उष्णतेसाठी तयार करणे गरजेचे असते.
भांडे आधी पाण्यात भिजवा
नवीन क्ले पॉट किमान काही तास स्वच्छ पाण्यात भिजत ठेवावा. यामुळे भांड्यामध्ये ओलावा टिकून राहतो आणि उष्णतेचा धक्का सहन करण्याची क्षमता वाढते. अनेकजण ते रात्रभर भिजवून ठेवण्याचा सल्ला देतात.
तेलाचा लेप का महत्त्वाचा?
भांडे पाण्यातून काढून पूर्ण कोरडे झाल्यानंतर त्याच्या आतील आणि बाहेरील भागाला मोहरी किंवा शेंगदाण्याच्या तेलाचा हलका लेप द्यावा. त्यानंतर ते एक-दोन दिवस चांगले सुकू द्यावे. यामुळे भांडे अधिक मजबूत होण्यास मदत होते.
सुरुवात नेहमी कमी आचेपासून करा
मातीची भांडी तापमानातील अचानक बदल सहज सहन करू शकत नाहीत. त्यामुळे स्वयंपाक करताना सुरुवातीला कमी आच ठेवावी आणि नंतर हळूहळू तापमान वाढवावे. थंड भांडे थेट मोठ्या आचेवर ठेवल्यास ते तडकण्याचा धोका असतो.
योग्य चमच्यांची निवड करा
स्टील किंवा धातूच्या चमच्यांमुळे मातीच्या भांड्यांच्या आतील पृष्ठभागावर ओरखडे पडू शकतात. त्यामुळे लाकडी किंवा सिलिकॉनचे चमचे वापरणे अधिक सुरक्षित मानले जाते.
स्वच्छता करताना घ्या काळजी
मातीची भांडी धुताना तीव्र रासायनिक डिटर्जंट वापरणे टाळावे. कोमट पाणी आणि मऊ स्क्रबरच्या मदतीने भांडे स्वच्छ करावे. वापरानंतर भांडे पूर्ण कोरडे झाल्यावरच कपाटात ठेवावे.
मातीच्या भांड्यातील अन्न का ठरते खास?
मातीच्या भांड्यांमध्ये अन्न हळूहळू शिजते. त्यामुळे पदार्थांची नैसर्गिक चव, सुगंध आणि पोषक घटक अधिक काळ टिकून राहतात. कमी तेलातही स्वादिष्ट पदार्थ तयार होत असल्याने आरोग्याबाबत जागरूक असलेल्या अनेकांच्या पसंतीस ही भांडी उतरू लागली आहेत.