उन्हाळ्यात खा हलकं-फुलकं! काकडीचं धिरडं देईल शरीराला थंडावा 
लाईफस्टाईल

उन्हाळ्यात खा हलकं-फुलकं! काकडीचं धिरडं देईल शरीराला थंडावा

उन्हाळ्यात हलका आणि थंडावा देणारा नाश्ता हवा असेल, तर काकडीचं धिरडं हा उत्तम पर्याय आहे. झटपट तयार होणारी ही रेसिपी पोटाला आराम देते आणि दिवसभर फ्रेश वाटण्यास मदत करते.

Mayuri Gawade

उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवावं, हा प्रश्न नेहमीच पडतो. हलकं, पटकन तयार होणारं आणि शरीराला थंडावा देणारं काहीतरी हवं असेल, तर काकडीचं धिरडं हा एक परफेक्ट पर्याय ठरू शकतो. करायला सोपं, चवीला मस्त आणि पोटावर अजिबात जड न पडणारं हे धिरडं उन्हाळ्यासाठी अगदी योग्य आहे.

साहित्य

१ मध्यम आकाराची काकडी
२-३ चमचे तांदूळ पीठ
१-२ चमचे बेसन
१ चमचा रवा
२-३ हिरव्या मिरच्या
३-४ लसूण पाकळ्या
थोडं आलं


१ छोटा कांदा (बारीक चिरलेला)
१ लहान गाजर (किसलेलं)
कोथिंबीर (बारीक चिरलेली)
कडीपत्ता
१/२ चमचा जिरे
चवीनुसार मीठ
तेल
पाणी

कृती

सर्वप्रथम काकडी सोलून तिचे तुकडे करा. हे तुकडे मिक्सरमध्ये घालून त्यात तांदूळ पीठ, बेसन, रवा, हिरवी मिरची, लसूण आणि आलं घाला. थोडंसं पाणी घालून हे मिश्रण एकजीव आणि किंचित पातळ वाटून घ्या.

हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात बारीक चिरलेला कांदा, किसलेलं गाजर, कोथिंबीर आणि कडीपत्ता घाला. त्यात जिरे आणि चवीनुसार मीठ घालून सगळं मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या.

आता तवा गरम करून त्यावर थोडंसं तेल लावा. तयार केलेलं मिश्रण तव्यावर ओतून पातळ थर पसरवा. बाजूंनी थोडंसं तेल सोडा आणि झाकण ठेवून एक बाजू शिजू द्या. नंतर उलटून दुसरी बाजू कुरकुरीत होईपर्यंत शिजवा.

गरमागरम काकडीचं धिरडं तयार आहे. दही, लोणचं किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

टिप्स

  • काकडी गोडसर असेल तर चव अधिक छान लागते

  • मिश्रण खूप जाड करू नका, थोडं पातळ ठेवल्यास धिरडं मऊ आणि कुरकुरीत होतं

  • आवडीनुसार इतर भाज्याही घालू शकता

  • कमी तेलात बनवल्यास हे अधिक हेल्दी ठरतं

उन्हाळ्यात हलका, चविष्ट आणि शरीराला थंडावा देणारा हा नाश्ता एकदा नक्की करून पाहा.

अटल पेन्शनचे केंद्रीकरण चिंताजनक; बँकांनी ग्राहकांना पेन्शन स्लॅबसाठी प्रवृत्त करावे - वित्तीय सेवा विभाग सचिव एम. नागराजू

मुंबईकरांसाठी खुशखबर! गोराईत महाराष्ट्रातील पहिल्या मँग्रोव्ह पार्कचं २८ मे रोजी उद्घाटन; पर्यावरण पर्यटनाला मिळणार चालना

Mumbai : वांद्र्यातील गरीब नगर पाडकाम ८५ टक्के पूर्ण; "मानवी दृष्टिकोन ठेवून कारवाई," पश्चिम रेल्वेचं स्पष्टीकरण

नवी मुंबईत ५०४ इमारती धोकादायक; ५२ इमारती अतिधोकादायक; विभागवार सर्वेक्षणानंतर यादी जाहीर

वाढत्या तापमानामुळे कांदा सडतोय; कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त