सध्या शिंका येणे, ताप, घसादुखी, खोकला, अंगदुखी आणि थकवा यांसारखी लक्षणे पुन्हा जाणवू लागली आहेत. फ्लूचा त्रास झाल्यानंतर जेवणाची इच्छा कमी होणे स्वाभाविक आहे. मात्र, तुम्ही काय खाता, काय पिता आणि काय टाळता, यामुळे आजारपणाचा सामना करताना शरीराला मदत होऊ शकते.
आपलं रोजचं जेवण फ्लू बरा करू शकत नाही. तसेच योग्य आहार घेतल्याने फ्लूची लागण होणार नाही, याची हमीही देता येत नाही. मात्र, योग्य पोषण, पुरेसे द्रवपदार्थ आणि आवश्यक विश्रांती यामुळे संसर्गाशी लढताना शरीराला आधार मिळतो.
शरीरात पाण्याची कमतरता होऊ न देणे सर्वात महत्त्वाचे
तापामुळे घाम येऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. उलट्या किंवा जुलाब होत असल्यास शरीरातील द्रवपदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट्सचे नुकसान आणखी वाढू शकते. त्यामुळे दिवसभर थोड्या-थोड्या अंतराने पाणी, पातळ किंवा साधे सूप, चहा, नारळपाणी किंवा इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये घेत राहणे योग्य ठरते.
नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थच्या माहितीनुसार, चिकन सूप उपयुक्त ठरू शकते. चिकन सूपमध्ये शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास, जळजळ कमी करण्यास आणि कफाचा प्रवाह सुरळीत करण्यास मदत करणारे गुणधर्म असू शकतात.
फ्लू झाल्यावर काय खावे?
ताप, मळमळ किंवा पोट बिघडलेले असल्यास जड जेवण करणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे सुरुवातीला कमी प्रमाणात अन्न घ्यावे आणि शरीराला ते सहन होत असल्यास थोड्या-थोड्या अंतराने खावे.
मऊ आणि सहज खाता येणारे पदार्थ, जसे की मूगडाळीची खिचडी चांगला पर्याय ठरू शकतो. आजारी असताना रोज एकच पदार्थ खाल्ल्याने कंटाळाही येऊ शकतो. अशावेळी फळे, सूप आणि हलकी कोशिंबीर हेही चांगले पर्याय ठरू शकतात.
अंडीदेखील प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत. मात्र भूक असेल आणि शरीराला ते सहन होत असेल तरच खावे. दही हा प्रथिनांचा आणखी एक चांगला स्रोत असून त्यात प्रोबायोटिक्सही असतात.
संत्री, बेरी, किवी, खरबूज, पपई यांसारखी फळे ताजेतवाने वाटण्यासोबतच जीवनसत्त्वे, खनिजे आणि द्रवपदार्थही पुरवतात.
पूरकांपेक्षा संतुलित आहाराला प्राधान्य
मायो क्लिनिक हेल्थ सिस्टमनुसार, रोगप्रतिकारक शक्तीला मदत करणारी पोषकतत्त्वे प्रामुख्याने संतुलित आहारातून मिळवणे योग्य आहे. सर्दीची लक्षणे सुरू होण्यापूर्वी घेतलेले जीवनसत्त्व 'क' काही प्रमाणात लक्षणांचा कालावधी कमी करू शकते. मात्र, त्यामुळे आजार होण्यापासून संरक्षण मिळत नाही.
त्यामुळे लगेच पूरक आहारांकडे वळण्याऐवजी संत्री आणि इतर लिंबूवर्गीय फळे, स्ट्रॉबेरी, किवी, टोमॅटो आणि खरबूज यांसारख्या जीवनसत्त्व 'क' मुबलक असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
फ्लू आणि ताप असताना कोणते पदार्थ टाळावेत?
तळलेले आणि तेलकट पदार्थ - पोट आधीच बिघडलेले असल्यास तळलेले पदार्थ पचण्यास त्रासदायक ठरू शकतात. ओएसएफ हेल्थकेअर आजारी असताना तिखट किंवा तळलेले पदार्थ टाळण्याचा सल्ला देते, कारण ते पोटाला त्रास देऊ शकतात आणि पचण्यासही कठीण असतात.
मद्यपान - आजारी असताना मद्यपान टाळणे योग्य आहे. ताप, घाम येणे, उलट्या किंवा जुलाब यामुळे शरीरातील द्रवपदार्थ आधीच कमी होत असतील, तर अशावेळी मद्यपान शरीरासाठी योग्य ठरत नाही.
जास्त प्रमाणात कॅफिन - कॉफी, एनर्जी ड्रिंक्स आणि कॅफिनचे प्रमाण जास्त असलेली इतर पेये शरीराला पुरेसे पाणी मिळणे महत्त्वाचे असताना योग्य पर्याय ठरत नाहीत. विशेषतः पोटाशी संबंधित लक्षणे आधीच जाणवत असतील तर त्यांचे सेवन टाळणे चांगले.
अतितिखट पदार्थ - खूप तिखट करी किंवा पदार्थ खाण्याची इच्छा झाली तरी मळमळ, पोटात अस्वस्थता किंवा घसादुखी असताना ते त्रासदायक ठरू शकतात.
साखरयुक्त पेये - आजारी असताना फळांचा रस हा चांगला पर्याय वाटू शकतो. मात्र, पॅकेज्ड पेयांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिरिक्त साखर असू शकते. त्यामुळे अशा पेयांचे सेवन मर्यादित ठेवणे योग्य आहे.
जड जेवण - भूक नसताना आजारी व्यक्तीने पूर्ण जेवण करण्यासाठी स्वतःवर दबाव टाकण्याची गरज नाही. भूक कमी असेल तर जबरदस्तीने मोठे किंवा जड जेवण करण्याऐवजी शरीराला सहन होईल इतके हलके अन्न कमी प्रमाणात घ्यावे.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. 'नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)