मोबाईल वापरणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. Reliance Jio, Bharti Airtel आणि Vodafone Idea (Vi) या खासगी दूरसंचार कंपन्या येत्या तीन ते चार महिन्यांत मोबाईल रिचार्जच्या दरात १२ ते १५ टक्क्यांनी वाढ करू शकतात, असा अंदाज सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्च (Centrum Institutional Research) या ब्रोकरेज संस्थेने व्यक्त केला आहे. गेल्या दोन वर्षांनंतर संपूर्ण दूरसंचार क्षेत्रात एकत्रितपणे दरवाढ होण्याची ही शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे.
दरवाढीची शक्यता...
अहवालानुसार, सध्या खासगी क्षेत्रात Jio, Airtel आणि Vi या तीन प्रमुख कंपन्या असून त्यांच्यासोबत सरकारी BSNL आहे. बाजारातील स्पर्धा पूर्वीपेक्षा कमी झाल्याने खासगी कंपन्यांना दर वाढवण्याची संधी मिळू शकते.
याशिवाय, गेल्या दोन वर्षांत देशभरात 5G सेवा सुरू करण्यासाठी कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचा खर्च भरून काढण्यासाठी तसेच नफा वाढवण्यासाठी कंपन्या रिचार्ज दर वाढवू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ग्राहकांवर किती परिणाम होऊ शकतो?
सध्या कोणत्याही कंपनीने अधिकृतपणे दरवाढ जाहीर केलेली नाही. मात्र, जर १२ टक्के वाढ झाली, तर लोकप्रिय प्रीपेड प्लॅन्सचे दर साधारणपणे असे बदलू शकतात.
सध्या ३४९ रुपये असलेला २८ दिवसांचा प्लॅन सुमारे ३८९ रुपये होऊ शकतो.
८९९ रुपये किमतीचा ८४ दिवसांचा प्लॅन सुमारे १,००७ रुपये होऊ शकतो.
३,५९९ रुपये किमतीचा वार्षिक प्लॅन सुमारे ४,०३१ चार हजार एकतीस रुपये होऊ शकतो.
हे आकडे केवळ अंदाज असून अंतिम दर प्रत्येक कंपनीच्या निर्णयानुसार वेगळे असू शकतात.
फक्त किंमतच नाही, प्लॅन्समध्येही बदल होऊ शकतात
दूरसंचार कंपन्या दरवाढ करताना केवळ किंमत वाढवत नाहीत, तर डेटा लिमिट, वैधता आणि प्लॅनची रचना यामध्येही बदल करतात. त्यामुळे अंतिम रिचार्ज प्लॅन्स सध्यापेक्षा वेगळे असण्याची शक्यता आहे.
अधिकृत घोषणा अद्याप नाही
सध्या जिओ, एअरटेल किंवा व्हीआय यापैकी कोणत्याही कंपनीने दरवाढीची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, ब्रोकरेज संस्थेच्या अंदाजानुसार पुढील काही महिन्यांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी रिचार्जच्या दरांबाबत येणाऱ्या अधिकृत घोषणांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.