पावसाच्या सरी, गारवा आणि हातात वाफाळता चहाचा कप... हा आनंद शब्दांत सांगणं कठीणच. पावसाळ्यात चहाची चव अधिक खुलून यावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, घरी चहा करताना नकळत होणाऱ्या काही छोट्या चुका चहाचा रंग, चव आणि सुगंध बिघडवतात. परिणामी चहा कडू, काळपट किंवा अगदी फिका लागतो. काही सोप्या गोष्टींची काळजी घेतली, तर घरच्या घरीही टपरीसारखा स्वादिष्ट, सुगंधी आणि रंगदार चहा तयार करता येऊ शकतो.
१. चहा पत्ती जास्त वेळ उकळू नका
गडद रंग यावा म्हणून अनेकजण चहा पत्ती बराच वेळ उकळत ठेवतात. मात्र त्यामुळे चहा कडू लागतो. तसेच त्याचा नैसर्गिक सुगंधही कमी होतो. त्यामुळे चहा पत्ती घातल्यानंतर आवश्यक तेवढ्याच उकळ्या द्या.
२. पाणी आणि दुधाचं प्रमाण योग्य ठेवा
चहात पाणी जास्त आणि दूध कमी असेल तर चहा पातळ लागतो. उलट दूध जास्त झाल्यास चहाची मूळ चव हरवते. त्यामुळे आपल्या आवडीनुसार पाणी आणि दुधाचं संतुलित प्रमाण ठेवणं महत्त्वाचं आहे.
३. ताजी चहा पत्ती वापरा
जुनी किंवा ओलावा लागलेली चहा पत्ती वापरल्यास चहाला हवा तसा सुगंध आणि रंग मिळत नाही. चहा पत्ती नेहमी हवाबंद डब्यात साठवा आणि शक्यतो ताजीच वापरा.
४. मसाले आणि साखरेचं प्रमाण सांभाळा
आले, वेलची, लवंग किंवा दालचिनी घालताना त्याचं प्रमाण मर्यादित ठेवा. मसाले जास्त झाल्यास चहाची मूळ चव झाकली जाते. तसेच साखर पाणी गरम होत असतानाच घातल्यास ती व्यवस्थित विरघळून चव अधिक संतुलित लागते.
५. दूध घातल्यानंतर जास्त उकळू नका
दूध घातल्यानंतर चहा खूप वेळ उकळल्यास त्याची चव बदलते आणि चहा काळसर दिसू लागतो. दोन-तीन चांगल्या उकळ्या आल्या की गॅस बंद करणं अधिक योग्य ठरतं.
६. चहा नेहमी ताजाच प्या
चहा गाळल्यानंतर तो बराच वेळ तसाच ठेवू नका. जास्त वेळ ठेवलेला चहा हळूहळू कडवट होतो आणि त्याचा सुगंधही कमी होतो. त्यामुळे पावसाळ्यात गरमागरम चहा तयार होताच त्याचा आस्वाद घ्या.