National Women's Day: राष्ट्रीय महिला दिनानिमित्त जाणून घ्या थोर स्वातंत्र्य सेनानी 'सरोजिनी नायडू' यांचा जीवन प्रवास X - @Naveen_Odisha
लाईफस्टाईल

National Women's Day: राष्ट्रीय महिला दिनानिमित्त जाणून घ्या, थोर स्वातंत्र्य सेनानी 'सरोजिनी नायडू' यांचा जीवन प्रवास

भारताच्या थोर स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी नायडू यांचा आज (१३ फेब्रुवारी) जन्मदिवस. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान, महिलांच्या हक्कासाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि अशा अनेक महत्त्वपूर्ण कार्याच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस हा भारताचा 'राष्ट्रीय महिला दिन' म्हणून साजरा केला जातो. जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास.

Kkhushi Niramish

भारताच्या थोर स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी नायडू यांचा आज (१३ फेब्रुवारी) जन्मदिवस. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान, महिलांच्या हक्कासाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि अशा अनेक महत्त्वपूर्ण कार्याच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस हा भारताचा 'राष्ट्रीय महिला दिन' म्हणून साजरा केला जातो. जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले योगदान दिले. यात महिलांचा देखील समावेश होता. यामध्ये सरोजिनी नायडू यांचे स्थान सर्वोच्च आहे. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ रोजी हैदराबाद येथील एका बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण हैदराबाद, किंग्ज कॉलेज, लंडन आणि गिर्टन कॉलेज, केंब्रिज येथे झाले. सरोजिनी नायडू या उत्कृष्ट कवयित्री होत्या. त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांना वयाच्या १२ व्या वर्षापासूनच कविता करण्याचा छंद होता. त्यांना 'Nightingale of India' असे म्हटले जाते.

सरोजिनी नायडू यांची १९१४ मध्ये महात्मा गांधी यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली. महात्मा गांधींच्या विचाराने त्या प्रभावित झाल्या. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी वेचले. १९२५ मध्ये त्यांना अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. १९२३ ते १९२९ या दरम्यान त्या बॉम्बे म्यूनिसिपल कॉर्पोरेशनच्या सदस्य राहिल्या.

स्वातंत्र्यलढ्यात भोगला तुरुंगवास

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे त्यांना अनेक वेळा अटक करण्यात आली. १९३० मध्ये सरोजिनी नायडू यांना पहिल्यांदा मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आले. १९३१ मध्ये, त्यांनी गांधी आणि मदन मोहन मालवीय यांच्यासोबत गोलमेज परिषदेत भाग घेतला. नंतर १९३२ आणि १९४२ मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली तेव्हा त्यांनी २१ महिन्यांचा तुरुंगवास भोगला.

भारतीय राज्यघटना निर्मितीत सहभाग

भारतीय राज्यघटना निर्मितीत देखील त्यांचा सहभाग आहे. संविधान सभेत ज्या मोजक्या १५ महिला सदस्य होत्या. त्यापैकी त्या एक होत्या. संविधान निर्मितीच्या सर्व चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. स्वतःची स्पष्ट मते मांडली.

भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल

स्वतंत्र भारताच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. १९४७ मध्ये तत्कालीन संयुक्त प्रांत (आजचा उत्तर प्रदेश) राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या आणि सातत्याने महिलांच्या विकासासाठी झटणाऱ्या सरोजिनी नायडू यांचा लखनऊ येथे २ मार्च १९४९ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. १३ फेब्रुवारी २०१४ मध्ये त्यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधत हा दिवस 'राष्ट्रीय महिला दिवस' म्हणून साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली.

जयंतीनिमित्त सोशल मीडिया पोस्टवरून अभिवादन

आज सरोजिनी नायडू यांची १४६ वी जयंती आहे. त्यानिमित्त अनेक राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील दिग्गज आणि विविध संस्थांनी सोशल मीडिया पोस्टवरून त्यांना अभिवादन केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयात उपसंचालक पदावर कार्यरत दयानंद कांबळे यांनी व्हिडिओ शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

''भारताच्या 'nightingale of India' सरोजिनीनायडू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण. सविनय कायदेभंग चळवळ आणि भारत छोडो चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी त्या एक होत्या. त्या काळात ब्रिटिशांनी त्यांना वारंवार अटक केली आणि २१ महिन्यांहून अधिक काळ तुरुंगातही घालवले,'' असे दयानंद कांबळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेले आहे.

अखेर युद्ध संपले; अमेरिका-इराणमध्ये शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी; करारात १४ मुख्य मुद्दे; मोदींसह जागतिक नेत्यांकडून कराराचे स्वागत

पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून; १० जुलैपर्यंत चालणार कामकाज, उपसभापती निवडीकडे लक्ष

देशावरून मोसमी ढगच गायब; 'सॅटेलाईट इमेज'मधून मिळाली माहिती; महाराष्ट्रासह १६ राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षाच

Mumbai : पाणीकपातीत लवकरच आणखी वाढ

ममतादीदींच्या शरणागतीचे आश्चर्य