भारतीय स्वयंपाकात हिरव्या मिरचीचा वापर जवळपास दररोज केला जातो. मात्र, बहुतेक जण प्रत्येक पदार्थासाठी मिरची एकाच पद्धतीने चिरतात. प्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार यांच्या मते, ही छोटीशी सवयही पदार्थाची चव आणि फ्लेवर बदलू शकते. त्यांनी सोशल मीडियावर हिरवी मिरची चिरण्याची योग्य पद्धत सांगितली असून, त्यांची ही सोपी टिप सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रत्येक मिरचीचा आकार वेगळा
रणवीर ब्रार सांगतात की, सर्व हिरव्या मिरच्या एकसारख्या नसतात. त्यामुळे सर्वप्रथम मिरचीच्या खालच्या बाजूचा छोटासा भाग कापून तिचा आकार समान करावा. कापलेला तुकडा फेकून देण्याऐवजी तो पुन्हा पदार्थात वापरू शकता.
मिरचीच्या जाड बाजूला चिरा द्या
प्रत्येक मिरचीची एक बाजू जाड आणि गोलसर, तर दुसरी बाजू सपाट असते. मिरचीच्या जाड बाजूला उभी चीर द्यावी. त्यामुळे मिरचीतील तिखटपणा आणि फ्लेवर पदार्थात अधिक चांगल्या प्रकारे मिसळतो.
तिखटपणा हवा तसा ठरवा
काही जण मिरचीतील बिया काढून टाकतात, तर काही त्या तशाच ठेवतात. रणवीर ब्रार यांच्या मते, हा निर्णय पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार असावा. कमी तिखट पदार्थ हवा असेल तर बिया काढून टाका. मात्र, जास्त तिखट चव हवी असेल तर बिया तशाच ठेवा.
छोटा बदल, मोठा फरक
हिरवी मिरची योग्य पद्धतीने चिरल्यास तिचा सुगंध, तिखटपणा आणि फ्लेवर पदार्थात अधिक संतुलितपणे मिसळतो. त्यामुळे साधा पदार्थही अधिक चविष्ट होऊ शकतो. रणवीर ब्रार यांची ही सोपी किचन टिप स्वयंपाक करताना नक्कीच उपयोगी ठरू शकते.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)