नवी दिल्ली : देशात १४ ते १८ वयोगटातील ८६.८ टक्के मुले विविध शिक्षणसंस्थांमध्ये शिकत आहेत. मात्र, त्यातील २५ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचे त्यांच्या प्रादेशिक भाषेतील पुस्तक व्यवस्थित वाचता येत नाही, असा खळबळजनक अहवाल ‘असर’ या संस्थेने जाहीर केला आहे.
‘असर २०२३’चा ‘मूलभूत गोष्टींच्या पलिकडे’ हा ग्रामीण भारतातील १४ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांवर प्रकाश टाकणारा अहवाल प्रकाशित झाला आहे. या अहवालात म्हटले आहे की, १८ किंवा त्याहून अधिक वयोगटातील ३२ टक्क्यांहून अधिक मुले शैक्षणिक संस्थांमध्ये नोंदणीकृत नाहीत, तर इयत्ता अकरावी आणि बारावीतील निम्म्याहून अधिक विद्यार्थी मानव्य शाखेशी संबंधित विषय निवडतात. त्यानंतर विद्यार्थी विज्ञान व व्यापार या विषयाला प्राधान्य देतात. तर मुलांच्या तुलनेत मुली विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या विषयाचे अभ्यासक्रम कमी निवडतात. गेल्या वर्षीच्या अहवालात असे दिसून आले की, सहा ते १४ वर्षे वयोगटातील मुलांची नोंदणी २०१० मध्ये ९६.६ टक्के होती. ती २०१४ मध्ये ९६.७ टक्के आणि २०१८ मध्ये ९७.२ टक्क्यांवरून २०२२ मध्ये ९८.४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तर देशातील केवळ ५.६ टक्के तरुण व्यावसायिक प्रशिक्षणात सहभागी होतात. तसेच बहुतांशी तरुण अल्प कालावधीचे अभ्यासक्रम निवडतात. त्याचे प्रमाण पुरुषांमध्ये ४०.३ टक्के तर महिलांचे प्रमाण २८ टक्के आहे, असे अहवालात नमूद केले.
सर्व्हेक्षणात काय विचारले?
‘असर २०२३’या अहवालासाठी २६ जिल्ह्यातील २८ जिल्ह्यात सर्व्हेक्षण करण्यात आले. १४ ते १८ वयोगटातील ३४७४५ विद्यार्थ्यांचे सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणात विद्यार्थ्यांच्या मूलभूत वाचन, गणित व इंग्रजी, लेखी सूचना, गणिती आकडेमोड आदींचे सर्व्हेक्षण केले.