मुंबई: आज राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडत आहे. यादरम्यान विविध मतदान केंद्रावर गोंधळाचं वातावरण दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारावर लोक नाराजी व्यक्त करतानाचे व्हिडिओ समोर येत आहेत. अशातच सहा वाजले तरी अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसत आहे. मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत असल्यानं अनेक मतदारांच्या मनात आपल्याला मतदान करायला मिळणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. अशातच अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी एक व्हिडीओ शेअर करत मतदान केंद्राबाहेरील रांगेमध्ये सहा वाजेपर्यंत उपस्थित असलेल्या सर्वांचं मतदान होईपर्यंत मतदान केंद्राचं कामकाज सुरु राहणार असल्याचं म्हटलं आहे.
सर्व मतदारांचं मतदान पूर्ण झाल्याची खात्री झाल्यावरच कामकाज थांबणार...
कित्येकवेळा असं दिसतं की, मतदारांची गर्दी मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये म्हणजेच पाच ते सहा दरम्यान होते. याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सूचना अतिशय स्पष्ट आहे. सहा वाजेपर्यंत जे कोणी मतदान केंद्राच्या आवारात मतदानासाठीच्या रांगेत उभे असतील, त्यातील प्रत्येक माणसाचं मतदान होईपर्यंत मतदान केंद्राचं कामकाज चालू राहील आणि सर्व मतदारांचं मतदान पूर्ण झाल्याची खात्री झाल्यावरच मतदानाचं कामकाज थांबवण्यात येईल. त्यामुळं मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी सहा वाजायच्या आत मतदान केंद्रावर पोहोचावं आणि गर्दी असल्यास रांगेमध्ये उभं राहावं मग कितीही उशिर होवो त्यांना मतदानाची संधी नक्की मिळेल, असे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी सांगितलं.