कोल्हापूर : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले असून ते घुसखोरांना आपली व्होट बँक बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी येथे केला. तसेच 'भारत ही काही धर्मशाळा' नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये संभाव्य मोठ्या फुटीचा संदर्भ देत अमित शहा म्हणाले की, यापूर्वी लोकांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाचा स्वतंत्रपणे उल्लेख करावा लागायचा. परंतु, आता कोणताही गट उरलेला नाही. देशात आता फक्त एकच शिवसेना अस्तित्वात आहे आणि त्याचे नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत.
शिवसेना (युबीटी) चे किमान ६ लोकसभा खासदार उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारण्याच्या तयारीत असून, ते सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याने ठाकरे गट सध्या मोठ्या संकटात सापडला आहे.
यावर शहा म्हणाले, "हे काँग्रेस नेते आणि काँग्रेसच्या मांडीवर बसलेले उद्धवजी घुसखोरांना आपली व्होट बँक बनवून राजकीय अस्तित्व टिकवू पाहत आहेत. मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, हा देश म्हणजे कोणतीही धर्मशाळा नाही. या देशात फक्त तेच राहू शकतात जे येथील नागरिक आहेत. प्रत्येक घुसखोराची ओळख पटवून त्याला देशाबाहेर हाकलून दिले जाईल, असेही गृहमंत्री म्हणाले.