अहिल्यानगर: दिल्लीमध्ये सुरू असलेल्या ‘सीजेपी’च्या विद्यार्थी आंदोलनाला समर्थन देण्याबरोबरच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, यासाठी समाजसेवक अण्णा हजारे यांनी नगर शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलाच्या आवारात गुरुवारी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत मौनव्रत आंदोलन केले. त्यानंतर ते आपल्या मूळ गावी राळेगणसिद्धी येथे परतल्याचे कळते.
नवी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाची धार कमी व्हावी. त्याचबरोबर त्यांच्या आंदोलनापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधले जावे याच उद्देशाने अण्णांनी अचानक मौनव्रत केल्याचे बोलले जात आहे. अण्णांनी २०११मध्ये दिल्लीत केलेल्या उपोषणामागे भाजप होती व आताच्या अण्णांच्या मौनव्रतामागेही भाजपच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे श्रेय झुरळांऐवजी अण्णांना मिळावे, अशीही व्यूहरचना अण्णांच्या आंदोलनामागे असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राळेगणसिद्धी येथून अण्णा आज दुपारी साडेबाराच्या सुमारास नगरमधील आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी भारतमातेचे पूजन करून मौनव्रताला प्रारंभ केला. तेव्हा नीट परीक्षांर्थींच्या आत्महत्येकडे लक्ष वेधतानाच, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी स्थानिक विद्यार्थ्यांनी केली. तसेच, त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या.
समाजसेवक अण्णा हजारे यांनी याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी केलेली आहे. तसेच, दिल्ली येथील आंदोलनात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेबद्दलही चिंता व्यक्त करून विद्यार्थ्यांशी लोकशाही मार्गाने चर्चा करण्याची मागणीही त्यांनी केलेली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी माहिती अधिकार कायद्याच्या नियमावलीमध्ये राज्य सरकारने जाचक बदल केल्यानंतर अण्णांनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, त्यांचे आंदोलन सुरू होण्याआधीच सरकारने निमावलीला स्थगिती दिल्याने हजारे यांनी आपले प्रस्तावित आंदोलन स्थगित केले होते.