रामभाऊ जगताप/कराड
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी आळंदी ते पंढरपूर या श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी पालखी आषाढी वारीला काही दिवसातच सुरूवात होणार असून, अबालवृध्द भाविकांसमवेत प्रशासनही या वारीच्या तयारीत गुंतले आहे. कोरोना महामारीच्या मागील दोन वर्षांच्या काळात आषाढी दिंडी सोहळ्यावर शासनाने निर्बंध घातले होते. मात्र यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे पुन्हा नव्या जोमात या दिंडीला सुरूवात होणार आहे. यंदाच्या वारीला पंढरपूरात १५ लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
वारीनिमित्त अॅपचे उद्घाटन
यंदा आषाढी वारीनिमित्त शासनातर्फे अॅपचेही उद्घाटन करण्यात आले आहे. यामध्ये पालखी मार्गक्रमण, विसावा व मुक्कामाचे ठिकाण,पालखी सोहळ्याचे प्रमुख, वैद्यकीय सेवा, पाण्याचा टँकर, गॅसची टाकी मिळण्याचे ठिकाण, रुग्णवाहिका, अग्निशमन, लाईव्ह पंढरपूर दर्शन आदी महत्वाची माहिती यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सातारा जिल्हाधिकाऱ्यांतर्फेही पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणी आवश्यक सुविधा व दुरुस्ती करण्यात येत आहे. नीरा नदीवरील पुलाची दुरुस्ती करण्यात येत आहे. पाडेगाव घाटाची स्वच्छता व दुरुस्ती करण्यात येत आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात औषधांची सुविधा करण्यात येत आहे.