नाशिक : मध्यरेल्वेने विनातिकीट व अनधिकृत प्रवासाविरोधात चालवलेल्या मोहिमेत एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत विक्रमी कारवाई केली आहे. तब्बल १७.१९ लाख प्रवाशांना पकडत १००.५० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
फक्त ऑगस्ट २०२५ महिन्यातच २.७६ लाख प्रवासी विनातिकीट किंवा अयोग्य तिकीटासह प्रवास करताना आढळले. त्यांच्याकडून १३.७८ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही रक्कम ऑगस्ट २०२४ मधील ८.८५ कोटींपेक्षा तब्बल ५५ टक्के जास्त आहे. प्रकरणांच्या संख्येतही १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
भुसावळ विभागातून सर्वाधिक वसुली
विभागनिहाय आकडेवारीनुसार, भुसावळ विभागात ३६.९३ कोटी, मुंबईत २९.१७ कोटी, नागपूरमध्ये ११.४४ कोटी, पुण्यात १०.४१ कोटी, सोलापूरमध्ये ५.०१ कोटी तर मुख्यालयात ७.५४ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
विनातिकीट प्रवास थांबवण्यासाठी मध्य रेल्वे विविध पद्धतींनी तपासणी करते. यात स्टेशन तपासणी, अॅम्बुश तपासणी, सघन तपासणी आणि मेगा ड्राइव्हचा समावेश आहे. ही मोहिम मेल/एक्सप्रेस, प्रवासी, विशेष गाड्या तसेच मुंबई-पुणे उपनगरीय गाड्यांमध्ये राबवली जाते.
तिकीट फसवणूक थोपवण्यासाठी अलीकडेच UTS मोबाइल अॅपवरील स्थिर QR कोड बुकिंग सेवा बंद करण्यात आली आहे. या सुविधेचा गैरवापर होत असल्याचे समोर आले होते. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले असून, विनातिकीट प्रवासावरील शून्य-सहनशील धोरण कायम राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.