उल्हासनगर : श्रीनगर ते जम्मू-काश्मीर मुख्य रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. या ठिकाणी अमरनाथ यात्रेसाठी जाणारे उल्हासनगर शहरातील अनेक नागरिक अडकल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पांठ्यारी गुफेजवळ रस्ता खचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. उल्हासनगर शहरातील अनेक नागरिक हे अमरनाथ यात्रेला गेले आहेत. ते तेथे फसले असल्याची माहिती मिळत आहे. उल्हासनगरमधील प्रसिद्ध बालाजी ट्रॅव्हल्सचे मालक दीपक चंचलानी हे देखील तेथे अडकले आहेत, ते तेथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती सोशल मीडियावर टाकली आहे. तसेच सर्व नागरिक सुखरूप असल्याचे देखील त्यांनी व्हिडीओमध्ये नमूद केले आहे.