पुणे : राज्यभर गाजत असलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. २६) प्रतिक्रिया दिली. ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगत, या प्रकरणाकडे केवळ गुन्हा म्हणून न पाहता मुलांमध्ये सूडबुद्धी आणि हिंसक मानसिकता का निर्माण होते, याचाही समाजाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
'समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज'
पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "ही अतिशय धक्कादायक आणि अनाकलनीय घटना आहे. एवढ्या कमी वयात तरुणांमध्ये क्रूर आणि सूडबुद्धीने प्रेरित विचार का निर्माण होतात, याचा समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सुशिक्षित आणि सुस्थितीत कुटुंबांतील तरुणांमध्ये अशी मानसिकता का तयार होते, याचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा. या प्रकरणाकडे केवळ गुन्हा म्हणून पाहून चालणार नाही, तर त्यामागील सामाजिक कारणांचाही शोध घेणे आवश्यक आहे."
"मुलांमध्ये इतक्या कमी वयात क्रूर आणि सूडबुद्धीचे विचार निर्माण होऊ नयेत, यासाठी समाजात कोणते वातावरण आणि व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे, यावरही विचार होणे आवश्यक आहे. ही घटना खरोखरच अत्यंत धक्कादायक आहे," असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
विशाल अग्रवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रिया केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर समोर आल्या. या भेटीत त्यांनी आरोपींवर न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना विशाल अग्रवाल यांनी सांगितले की, "या प्रकरणावर मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवणार असून दोषींना लवकरात लवकर न्यायालयासमोर उभे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे."
कटात आणखी काही जणांचा सहभाग?
विशाल अग्रवाल यांनी या हत्येच्या कटात आणखी काही जण सहभागी असण्याची शक्यता व्यक्त केली. आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल हे जवळचे मित्र असल्याचे सांगत या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली.
लग्नापूर्वी सर्व माहिती दिल्याचा दावा
केतनला वैद्यकीय कारणांमुळे डोक्यावरचे केस काही प्रमाणात गळण्याची समस्या होती. मात्र, लग्न ठरण्यापूर्वी ही गोष्ट सिया गोयल आणि तिच्या कुटुंबाला स्पष्टपणे सांगितल्याचे विशाल अग्रवाल यांनी म्हटले.
"जर ही गोष्ट त्यांना मान्य नसती, तर त्यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव नाकारण्याची पूर्ण संधी होती," असेही ते म्हणाले.
सियाच्या कुटुंबावरही आरोप
विशाल अग्रवाल यांनी आरोप केला की, लग्न ठरण्यापूर्वी सियाच्या कुटुंबीयांनी ती कोणत्याही पार्टीला जात नसल्याचे सांगितले होते. मात्र, नंतर ही माहिती चुकीची असल्याचे समोर आल्याचा दावा त्यांनी केला.