मुंबई : देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पाहून लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मते दिली, या भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानाने महायुतीत कुरबूर सुरू झाली. धस यांच्या विधानाला शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेटमंत्री शंभूराज देसाई यांनी उपरोधिक शैलीत उत्तर दिले. “एकनाथ शिंदे कधीही म्हणाले नाहीत की, माझ्या एकट्यामुळे हे झाले, चेहरा फडणवीसांचा होता, परंतु नेतृत्व शिंदे यांचे होते,” असे देसाईंनी धस यांना सुनावले.
शंभूराज देसाई म्हणाले, “सुरेश धस यांचे हे मत असले, तरी महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जात असताना सर्व नेत्यांनी सांगितले होते की, त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यावेळी एकनाथ शिंदेंचा चेहरा घेऊन निवडणुकीला सामोरे गेलो.”
लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल आज जरी तुम्ही महिलांना विचारले तर महिला सांगतात की, केवळ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते म्हणून आम्हाला ही योजना मिळाली. त्यामुळे शेवटी ही सामूहिक जबाबदारी आहे, असे शंभूराज देसाई म्हणाले.
असे शिंदे कधी म्हणाले
एकनाथ शिंदे हे नेहमी म्हणायचे की, मी आणि माझ्यासोबतचे दोन्ही मुख्यमंत्री मिळून आम्ही हे सरकार चालवत आहोत. शिंदे कधीच असे म्हणाले नाहीत की, मी एकट्याने निवडणुका लढवल्या, माझ्या एकट्यामुळे हे झाले. एकनाथ शिंदे आजही म्हणतात, आम्ही तिघांनीही प्रयत्न केले म्हणून हे यश मिळाले. महायुतीचे यश हे तिन्ही पक्षांचे आहे. त्यावेळी नेतृत्व एकनाथ शिंदे यांचे होते, असे म्हणत देसाईंनी धस यांना सुनावले.