मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येत असलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेला पावसाचा फटका बसला आहे. राज्यातील काही भागात २६ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
राज्य शिक्षण मंडळामार्फत जुलै, ऑगस्टमध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) १६ जुलै ते ८ ऑगस्ट आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षा १६ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये २६ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे २६ जुलै रोजी होणाऱ्या दहावी परीक्षेचे पेपर ३१ जुलै रोजी व बारावी परीक्षेचे पेपर ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेले आहेत.
दहावी परीक्षा-
२६ जुलै रोजीची सकाळ सत्रातील विज्ञान तंत्रज्ञान भाग - २ ची परीक्षा ३१ जुलै रोजी त्याच सत्रात घेण्यात येणार आहे.
बारावी परीक्षा-
२६ जुलै रोजीची सकाळ सत्रात वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, एमसीवी, सी, पेपर २ आता ९ ऑगस्ट रोजी त्याच वेळेत घेण्यात येणार आहे.