महाराष्ट्र

चार वर्षांत १६ लाखांहून अधिक उंदरांचा खात्मा, एका उंदराचा नायनाट करण्यासाठी...

पावसाळ्याआधी प्रत्येक ठिकाणी तीन ते चार वेळा ही मोहीम राबवली जाते. पावसाळ्यात ही मोहीम बंद असते. मात्र,

प्रतिनिधी

पावसाळ्यात लेप्टोचा धोका अधिक असतो. त्यामुळे लेप्टो पसरण्यास कारणीभूत ठरत असलेल्या उंदरांचा नायनाट करण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागातर्फे विशेष मोहीम राबवण्यात येते. जानेवारी २०१८ ते मे २०२२ या जवळपास साडेचार वर्षांच्या कालावधीत तब्बल १६ लाख ४५ हजार १९ उंदरांचा खात्मा करण्यात आला. दरम्यान, एका उंदराचा नायनाट करण्यासाठी संस्थेला २२ रुपये देण्यात येतात.

कोरोनाच्या चौथ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासह पावसाळी आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर उभे ठाकले आहे. लेप्टो, मलेरिया, एच-वन एन-वन, गॅस्ट्रो, हेपटायसिस आणि डेंग्यू यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेचा कीटकनाशक विभागही सरसावला आहे. साचलेल्या पाण्यात उंदीर, गायी, म्हशी, घोडे, कुत्रे आणि मांजर यांचे मलमूत्र असल्यास आणि त्याचा संपर्क जखम असलेल्या व्यक्तीबरोबर आल्यास अशा व्यक्तीला लेप्टोचा संसर्ग होतो. लेप्टोचा प्रसार रोखण्यासाठी कीटकनाशक विभागातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येते.

उंदरांना हाताने मारण्याबरोबरच अ‍ॅल्युमिनिअम फॉस्फाईडच्या गोळ्या टाकून मारले जाते. पावसाळ्याआधी प्रत्येक ठिकाणी तीन ते चार वेळा ही मोहीम राबवली जाते. मात्र पावसाळ्यात ही मोहीम बंद असते. मात्र, ज्यावेळी दोन ते चार दिवस पाऊस पडत नाही, त्यावेळी पुन्हा गोळ्यांचा वापर केला जातो. त्यामुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते, अशी माहिती पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी दिली.

भंगार व अडगळीच्या वस्तू घरात ठेवू नका. इमारतीचा परिसर, आवार स्वच्छ ठेवा. डेब्रिज व इतर सामान आवारात ठेवू नये, जेणे करून उंदरांना आसरा मिळणार नाही. अन्नपदार्थ उघड्यावर टाकू नये. उंदरांना खायला मिळाले की तिथेच ते बिळे करून राहतात व कालांतराने त्यांची संख्या वाढते. एक उंदीर मादी एका वेळेस ६ ते ८ उंदरांना जन्म देते. त्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते.

- राजेंद्र नारिंग्रेकर, कीटकनाशक विभागाचे अधिकारी

वर्षानुसार उंदरांचा खात्मा

२०१८ : ४,७५,५९०

२०१९ : ४,७७,८८९

२०२० : १, ९८, ४५१

२०२१ : ३,२३,४९३

मे २०२२ : १,६९,५९६

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

ओबीसी महासंघाचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती; पूर आणि भूस्खलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी