चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला आहे. पर्यटनासाठी गेलेल्या या मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे हे पाच तरुण रहिवाशी आहेत. गावातील पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.
मृतांची नावे जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे, तेजस ठाकरे आहे. मुलांनी घोडाझरी तलावावर पर्यटनाचा आनंद घेतला. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास सहा मुले पोहण्यासाठी तलावात उतरली. आर्यन हेमराज हा मुलगा कसाबसा वाचला. परंतु जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे ही पाचही मुले तलावात बुडाली. बुडालेल्या पाच जणांमध्ये दोन सख्खे भाऊ आहेत. दोन चुलत भाऊ आहेत. हे चार जण गावंडे कुटुंबातील आहेत, तर एका मित्राच समावेश आहे.