मुंबई : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून सरकारमध्ये बसलेल्या काही लाभार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोट्यवधी रुपयांचा लाभ झाला. मात्र, त्यामुळे देशातील लाखो वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. ‘ई-२०’ हा मोठा घोटाळा असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, असा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. तसेच इथेनॉल घोटाळाप्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
सपकाळ यांनी सोमवारी ‘ई-२०’ धोरणावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. “ई-२० चा निर्णय २०३० ला लागू होणे अपेक्षित होते. पण मोदी सरकारमधील काही हितसंबंधित लोकांना लाभ मिळावा, यासाठी घाईगडबडीत हा निर्णय लादण्यात आला.
इथेनॉलऐवजी पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याच्या मोठ्या तक्रारी पुढे येत आहेत. आखातातील इंधन तुटवड्याचा फायदा उचलण्यासाठी मोठा घोटाळा झाला असून त्याचा पर्दाफाश झाला पाहिजे,” असे सपकाळ म्हणाले.
“नितीन गडकरी यांच्या हट्टामुळे अनेक वाहने बंद पडली. इथेनॉलची वकिली करणारे गडकरीच असून या घोटाळ्यात अनेक दलालही आहेत. या दलालांचाही लवकरच पर्दाफाश होईल. पेट्रोलच्या किंमतीत पाणी विकून लोकांनी मोठी फसवणूक केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे,” अशी मागणीही त्यांनी केली.
फडणवीसांना दिल्लीत जाण्याची घाई
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवण्याचे कारस्थान सुरू असून त्यांनाही दिल्लीत जाण्याची घाई झाली आहे. हिंदी लादण्याचा निर्णय हा त्याचाच एक भाग होता. महायुती सरकारमध्ये त्यांची विकेट काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खरे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित शहा आहेत, फडणवीस शॅडो मुख्यमंत्री आहेत,” अशी टीकाही सपकाळ यांनी यावेळी केली.