जालना : जालना जिल्ह्यात गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उकाडा आणि दमट वातावरणापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी अनेक भागांत पाणी साचल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नद्या आणि नाले दुथडी भरून वाहू लागल्याने काही ठिकाणी पाणी साचले असून, सखल भागातील शेतांमध्ये खरीप पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अधिकृत माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या १२ तासांत जिल्ह्यात सरासरी ८३.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भोकरदन तालुक्यातील हसनाबाद महसूल मंडळात सर्वाधिक १५५.५ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील एकूण ३९ महसूल मंडळांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
जालना शहर आणि जालना ग्रामीण येथे प्रत्येकी ७८.८ मिमी, वाघरुळ ११०.५ मिमी, सेवली ११०.८ मिमी, रामनगर ९९.५ मिमी, भोकरदन १०८.५ मिमी, धावडा ११०.३ मिमी आणि आन्वा येथे १०२ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच पिंपळगाव रेणुकाई, बकणे पांगरी, वारुड, वतूर, तळणी आणि पांगरी गोसावी या भागांतही ९६ ते ११३ मिमी दरम्यान पाऊस झाला.
या पावसानंतर जिल्ह्यातील चालू मान्सून हंगामातील एकूण पर्जन्यमान ३७१.४ मिमीवर पोहोचले आहे. हंगामातील सरासरी पर्जन्यमान ६०३.१ मिमी असल्याने अजूनही अपेक्षित पावसाची प्रतीक्षा आहे. तालुकानिहाय जालना तालुक्यात सर्वाधिक ४२३.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका आणि ज्वारी या खरीप पिकांना मोठा फायदा होणार असला, तरी सखल भागातील शेतांमध्ये पाणी साचल्याने मुळे कुजण्याचा आणि पिके खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांतही जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)