रामभाऊ जगताप / कराड
जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश असलेल्या साताऱ्याजवळील कास पठारावरील फुलोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांना काही कालावधीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने या ठिकाणी साताऱ्याची ओळख सांगणाऱ्या सातारेन्सिस फूल अगदी तुरळक ठिकाणी दिसत असले, तरी यंदाचा बहरलेला फुलोत्सव हंगाम ऑगस्टमध्ये पाहायला मिळेल, असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. कारण, मुसळधार पावसानंतर श्रावणाच्या ऊन-पावसाच्या खेळात येथील जीवसृष्टी खऱ्या अर्थाने बहरते. फुलांचे गालिचे या वेळीच बहरतात, त्यामुळे आता पठारावर फुले बघण्यासाठी येणाऱ्यांनी याबाबत माहिती घेणे गरजेचे आहे.
दरम्यान, फुले येणाऱ्या परिसराचे संरक्षण करण्यासाठी तंगुसाची जाळी बसविण्याच्या कामाला सध्या सुरुवात झाली आहे. आगामी हंगामाच्या दृष्टीने हे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या जाळी बसवण्यात येत असली,तरी कास पठारावर फुले बहरण्यास अवकाश असून, आगामी हंगाम हा पंधरा ऑगस्टनंतरच सुरू होत असतो. त्यामुळे आता फुले पाहण्यास येणाऱ्यांची निराशा होऊ शकते,असेही कास कार्यकारी समितीच्या सदस्यांनी सांगितले.
कास पठाराचे व्यवस्थापन कास पठार कार्यकारी समिती वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली करते. कास, एकीव, पाटेघर, आटाळी, कुसुंबी, कासाणी या सहा गावांचा सहभाग असलेली समिती पठारावरील फुले व आजूबाजूच्या निसर्गाचे संवर्धन करण्याचे काम करते. या दृष्टीनेच सद्यःस्थितीत कास पठाराला तंगुसाची जाळी बसवण्याचे काम सुरू असून, लवकरच हे काम पूर्ण होईल.
कास पठाराला सुरुवातीला लोखंडी जाळीचे कुंपण होते. या लोखंडी जाळीमुळे प्राण्यांच्या भ्रमणमार्गात अडथळे निर्माण होतात, तसेच पठारावरील फुलांचे प्रमाण कमी होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या पुढाकाराने ही जाळी काढून टाकण्यात आली. त्यानंतर पर्यटकांच्या गर्दीपासून फुलांचे संरक्षण करण्यासाठी हंगाम कालावधीपुरती तंगुसाची जाळी बसविण्यास सुरुवात केली. हंगामानंतर ही जाळी काढून टाकण्यात येते. त्यामुळे येथील नैसर्गिक परिसंस्था अबाधित राखण्याचे काम केले जाते.
सातारेन्सिसचे दर्शन
कास पठार विविध रंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. या महिन्याच्या शेवटाला झालेल्या पावसामुळे कास पठार हिरवेगार झाले असून काही प्रदेशनिष्ठ फुलांचे तुरळक दर्शन होऊ लागले आहे. जून, जुलै महिन्यात सातारेन्सिस या खास साताऱ्याची ओळख सांगणाऱ्या फुलाचे दर्शन पठारावर होते. त्यानंतर रानहळद (चवर) पठारावर मोठ्या प्रमाणात येते; परंतु पठारावर फुलांच्या गालीचांची खऱ्या अर्थाने उधळण होते, ती सप्टेंबरमध्येच. यावेळी गेंद, तेरडा, सोनकी, मिकी माऊस या फुलांनी पठार बहरून जाते.
फुले पाहण्यास येणाऱ्यांची निराशा
दरम्यान, फुले येणाऱ्या परिसराचे संरक्षण करण्यासाठी तंगुसाची जाळी बसविण्याच्या कामाला सध्या सुरुवात झाली आहे. आगामी हंगामाच्या दृष्टीने हे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या जाळी बसवण्यात येत असली, तरी कास पठारावर फुले बहरण्यास अवकाश असून, आगामी हंगाम हा पंधरा ऑगस्टनंतरच सुरू होत असतो. त्यामुळे आता फुले पाहण्यास येणाऱ्यांची निराशा होऊ शकते, असेही कास कार्यकारी समितीच्या सदस्यांनी सांगितले.