कोल्हापूर : जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत झाला. दुचाकी आणि टेम्पोची धडक झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याने हसते खेळते कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाले आहे. या अपघातामध्ये दीपक चांदे (३९), त्यांची पत्नी शोभा ( ३५) त्यांची दोन मुले जय (१०) आणि मुलगी पूर्वा ( ७) यांचा जागीच मृत्यू झाला.
चांदे कुटुंबीय वास्तव्यास मुंबईत आहे. मात्र, सुट्टीचा महिना असल्याने गावी आले होते. दीपक चांदे यांनी मुंबईत मेहनत करत आजरा तालुक्यातील व्होन्याळी गावात घर बांधले होते. सुट्टी संपत आल्याने मुंबईकडे शुक्रवारी मुंबईला रवाना होण्यापूर्वी पाहुण्यांच्या भेटीसाठी ते दुंडगे गावी जात होते. मात्र, आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत अवघ्या कुटुंबाचा जागीच अंत झाला.