मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज २० दिवस चालणार आहे. ६ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. तर २५ मार्च २०२६ रोजी अधिवेशनाचे सूप वाजेल.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २३ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी विधानभवनात संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. बैठकीत विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज निश्चित करण्यात आले. अधिवेशन काळात होळी, गुढीपाडवा अशा सुट्ट्या येत असल्याने अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे शनिवारी, २८ फेब्रुवारी रोजी दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू राहणार आहे.
अधिवेशनाला १ ते ३ मार्च दरम्यान होळीची सुट्टी देण्यात आली आहे. त्यानंतर १९ मार्च (गुढीपाडवा), २० (शुक्रवार), २१ (शनिवार) आणि २२ मार्च (रविवार) असे सलग चार दिवस सभागृहाचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे - २५ मार्च रोजी अधिवेशन संस्थगित केले जाईल.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.