राज्य नेतृत्वबदलाच्या चर्चेला उधाण; फडणवीसांना दिल्लीत प्रमोशन, तर मुख्यमंत्रीपदासाठी बावनकुळेंचे नाव? 
महाराष्ट्र

राज्य नेतृत्वबदलाच्या चर्चेला उधाण; फडणवीसांना दिल्लीत प्रमोशन, तर मुख्यमंत्रीपदासाठी बावनकुळेंचे नाव?

केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाच्या चर्चेनंतर आता राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चेला एकच उधाण आले आहे.

Swapnil S

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाच्या चर्चेनंतर आता राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चेला एकच उधाण आले आहे. राज्यात कोणतीही निवडणूक नसतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या धडाकेबाज निर्णयाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊन त्यांच्या जागी नवे मुख्यमंत्री म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलाची चर्चा सुरू आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २० जुलै पासून सुरुवात होत आहे. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात खांदेपालट होऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

फडणवीस दिल्लीत गेल्यास त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून भाजपमधील अन्य नेत्याला संधी मिळणार आहे. त्यात चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव आघाडीवर आहे. स्वतः फडणवीस मुख्यमंत्रिपदासाठी बावनकुळे यांच्या नावाची शिफारस करण्याची शक्यता आहे. विदर्भाचे प्रतिनिधित्व करणारे बावनकुळे हे इतर मागास वर्गातील आहेत. राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे मराठा समाजातील आहेत. त्यामुळे प्रादेशिक आणि सामाजिक संतुलनात बावनकुळे अगदी योग्य पर्याय ठरू शकतात. बावनकुळे यांच्याशिवाय राज्यसभा सदस्य विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचीही नावे मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत आहेत. मात्र, या चर्चेला भाजपच्या अधिकृत सूत्रांकडून कोणताही दुजोरा मिळू शकला नाही.

गडकरी, निर्मला, प्रधान अडचणीत?

नीट परीक्षेच्या पेपर फुटीमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बदलले जाणार असल्याचीही चर्चा आहे. इथेलॉन संबंधित धोरणामुळे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे मंत्रिपद अडचणीत आहे. त्यामुळे गडकरी, प्रधान किंवा सीतारामन यांच्या जागी फडणवीस यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

सध्या अफवांचा बाजार गरम आहे. यातीलच अफवा आज पेरली गेली. त्याला बिनबुडाचे आकलन, म्हणावे लागेल. सूर्यप्रकाशाइतके एक सत्य आहे. महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस हेच २०३४ पर्यंत मुख्यमंत्री राहावेत, ही महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची भावना आहे. विकसित महाराष्ट्राची हीच गरज आहे. मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू नये.
चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री

Mumbai : पावसाळी दुर्घटना रोखण्यात कमी पडलो! 'झाडांभोवतीचे काँक्रीट काढण्याची जबाबदारी अभियंत्यांची'; अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांची कबुली

Monsoon Update : पुढील सात दिवस पाऊस रजेवर; पुणे वेधशाळेचा अंदाज

Vietnam Boat Tragedy: १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू; व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटना, २१ जणांना वाचविले

आजचे राशिभविष्य, १२ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Sunday Special Recipe : बाजारासारखे क्रिस्पी चिकन पॉपकॉर्न आता घरीच, वाचा सोपी रेसिपी