मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत सातत्याने राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्युदरात घट झाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यात एकूण ३३,००२ अपघात झाले असून त्यामध्ये १४ हजार ६६ अपघाती मृत्यू झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण ०.८३ टक्क्यांनी घटले आहे.
अपघातांची संख्या वाढली, पण मृत्यूचे प्रमाण घटले
मागील वर्षी याच कालावधीत ३२ हजार ७८४ अपघातांमध्ये १४ हजार १८५ मृत्यू झाले होते. अपघातांची या वर्षासोबत तुलना केल्यास अपघातांची संख्या २१८ ने वाढली असली तरी अपघाती मृत्यूंची संख्या ११९ ने म्हणजेच ०.८३ टक्क्यांनी घटली आहे. दरम्यान, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरही अपघाती मृत्यूंमध्ये मोठी घट नोंदवण्यात आली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत या मार्गावर ८२ अपघाती मृत्यू झाले होते तर २०२५ मध्ये ही संख्या ६१ वर आली आहे म्हणजेच २१ मृत्यूंमध्ये २६ टक्के घट झाली आहे तसेच अपघातांची संख्या ६६ वरून ५४ इतकी कमी झाली असून त्यामध्ये १८ टक्के घट नोंदवण्यात आली आहे.
५० टक्क्यांनी अपघात कमी करणार
राज्यातील रस्ता अपघातांची संख्या २०३० सालापर्यंत ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट परिवहन विभागाने निश्चित केले असून त्यासाठी भविष्यात रस्ता सुरक्षा उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. याचबरोबर, राज्यातील सर्व वाहनचालक व पादचारी नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहनही परिवहन विभागामार्फत करण्यात आले आहे.
'या' जिल्ह्यांमध्ये झाली घट
रस्ता सुरक्षा उपायांमुळे काही जिल्ह्यांमध्ये मृत्यूंच्या संख्येत विशेष घट दिसून आली आहे. नागपूर शहरात २१ टक्के, पालघरमध्ये २० टक्के, अमरावतीत १७ टक्के, पुण्यात १५ टक्के, धुळ्यात १४ टक्के तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १२ टक्क्यांनी अपघाती मृत्यू कमी झाले आहेत.