शाळा सुटली...कडक उन्हाळ्यामुळे सर्व शाळांना सुट्टी जाहीर 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

शाळा सुटली...कडक उन्हाळ्यामुळे सर्व शाळांना सुट्टी जाहीर

कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे आणि सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी सरकारने राज्यातील सर्व शाळांना सोमवारपासून (२७ एप्रिल २०२६) तातडीने उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे.

Swapnil S

पुणे - कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे आणि सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी सरकारने राज्यातील सर्व शाळांना सोमवारपासून (२७ एप्रिल २०२६) तातडीने उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केल्यानुसार, हा सुट्टीचा निर्णय केवळ सरकारी शाळांपुरता मर्यादित नाही. राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांना ही सुट्टी लागू असेल. यामध्ये सीबीएसई, आयसीएसई आणि ओआरएस अशा सर्व बोर्डांच्या शाळांचा समावेश करण्यात आला असून, शिक्षण क्षेत्रात एकवाक्यता राखण्यासाठी हा सर्वसमावेशक निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 'यलो' आणि 'ऑरेंज' अलर्ट जारी केला असून अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा ४३ ते ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. उष्ण वाऱ्यांमुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले असून, लहान मुलांसाठी हे वातावरण अत्यंत घातक ठरू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवर, पालकांच्या तक्रारी आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन हा तातडीचा आदेश देण्यात आला आहे.

उन्हाची तीव्रता पाहता सरकारने सुरुवातीला शाळांच्या वेळा बदलून त्या सकाळी ६:३० ते १०:३० अशा केल्या होत्या. मात्र, सकाळी १० वाजेनंतरही उष्णता इतकी वाढत होती की, मुलांना शाळेतून घरी परतताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. ज्या शाळांमध्ये अद्याप वार्षिक परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापन बाकी आहे, त्यांना ऑनलाइन माध्यमाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळात घरीच राहून स्वतःची काळजी घेण्याचे आणि भरपूर पाणी पिण्याचे आवाहन केले असून, या सुट्टीमुळे आता आगामी शैक्षणिक वेळापत्रकात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे.

अकोला देशात सर्वात उष्ण; जुन्नरमध्ये उष्माघाताचा बळी, पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

‘पक्षपाती’ न्यायमूर्तींविरुद्ध बंड; खटल्यात हजर न राहण्याचा अरविंद केजरीवालांचा निर्णय

भोंदूबाबा खरातबाबत धक्कादायक खुलासे; मुलींसोबत दारू प्यायचा, खंडण्यांतून कमावले कोट्यवधी

Mumbai : सोमवार ठरला घातवार; मरीन ड्राईव्हवर भीषण अपघातात तिघांचा बळी

हा लोकशाहीच्या मुळावरच घाव