मुंबई : राज्यातील हवामानातील चढउतार चालूच आहेत. गेले काही दिवस काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यानंतर आता सर्वत्र उष्णतामान वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः मुंबई व परिसरात येत्या दोन दिवसात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यभरात प्रचंड उकाडा आणि उन्हाचा कडाका जाणवणार आहे. तर मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला चोवीस तास यलो अलर्ट जारी केला आहे. तर मराठवाडा विदर्भात काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात उष्णतेच्या लाटा आणि मराठवाडा विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा आहे.
कुठे कोणता इशारा
२४ मार्च : मुंबई , ठाणे ,रायगड जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट. सातारा, सांगली, पुणे, हिंगोली या जिल्ह्यांना तुरळक पावसाची शक्यता
२५ मार्च : सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा यलो अलर्ट. मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता
२६ मार्च : यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट