Pune : नसरापूर अत्याचारप्रकरणी २८ मे रोजी दोषारोप ठेवणार 
महाराष्ट्र

Pune : नसरापूर अत्याचारप्रकरणी २८ मे रोजी दोषारोप ठेवणार

नसरापूर (ता. भोर, जि. पुणे) येथील अल्पवयीन बालिकेवरील अत्यंत गंभीर लैंगिक अत्याचार आणि खून खटल्याची महत्त्वपूर्ण सुनावणी गुरुवारी पुण्यातील जिल्हा व विशेष न्यायालयात पार पडली.

Swapnil S

पुणे : नसरापूर (ता. भोर, जि. पुणे) येथील अल्पवयीन बालिकेवरील अत्यंत गंभीर लैंगिक अत्याचार आणि खून खटल्याची महत्त्वपूर्ण सुनावणी गुरुवारी पुण्यातील जिल्हा व विशेष न्यायालयात पार पडली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचे आदेश देत, आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याच्यावर पुढील सुनावणीच्या वेळी म्हणजेच येत्या २८ मे रोजी दोषारोप निश्चित केले जातील, असे स्पष्ट केले आहे.

राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या या संवेदनशील गुन्ह्यामध्ये आरोपी भीमराव कांबळे याच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांच्या वतीने न्यायालयासमोर तब्बल ११०० पानांचे अत्यंत सविस्तर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील ॲॅड. अजय मिसर, मूळ फिर्यादी/तक्रारदाराचे वकील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल आणि तपास अधिकारी स्वतः न्यायालयात उपस्थित होते. आरोपी भीमराव कांबळे सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याने कारागृह प्रशासनाने त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर सादर केले होते.

आरोपीकडे वकील नसल्याने त्याला कायदेशीर सहाय्य मिळावे यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांना पत्र पाठवून सत्र खटल्याचा दांडगा अनुभव असलेल्या विधी सहाय्य संरक्षण वकिलाची नेमणूक करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

दोषारोप निश्चितीपूर्वी विधी सहाय्य वकीलांशी आरोपीचा थेट संवाद व्हावा आणि युक्तिवाद योग्य रीतीने व्हावा, यासाठी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य करत न्यायालयाने कारागृह प्रशासनाला आवश्यक सुरक्षा व्यवस्थेसह आरोपी भीमराव कांबळे याला पुढील सुनावणीच्या वेळी प्रत्यक्ष कोर्टात हजर करण्याचे कडक आदेश दिले आहेत.

न्यायालयाने दिलेले महत्त्वाचे आदेश

तपासासाठी नवीन अर्ज मंजूर: आरोपीची अधिकृत ओळख परेड घेणे आणि त्याची मानसिक स्थिती तपासण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय चाचणी करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी विशेष सरकारी वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने हा अर्ज तत्काळ मंजूर करत ही कायदेशीर प्रक्रिया पुढील सुनावणीपूर्वी (२८ मे पूर्वी) पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्लीत तीन दिवसांचा वाहतूक संप सुरू; दरवाढीसाठी वाहतूकदार आक्रमक

काजू पिकणार कोकणात, निर्यात केंद्र मात्र कोल्हापुरात! चंदगडमध्ये केंद्र उभारण्याचा प्रस्ताव

सर्व उच्च न्यायालयांनी ऑनलाइन सुनावणी घ्यावी; सरन्यायाधीशांची विनंती

तमिळनाडूत पुन्हा ‘वंदे मातरम’वरून वाद; शपथविधी कार्यक्रमात तमिळ गीताऐवजी ‘वंदे मातरम’ आधी वाजले

Weather Update : होरपळ सुरूच; ७५ टक्के देश तापलाय