राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय गेल्या अनेक महिण्यांपासून सुरूचं आहे. राज्यात अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी प्रचार, मोर्चे आणि उपोषणं सुरू आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला जागं करण्यासाठी आजपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरु करण्याचं आवाहन मराठा समाजाला केलं होतं. त्यानुसार आज कराड (जि. सातारा) शहरासह तालुक्यातील अनेक गावांत साखळी उपोषण सुरु करण्यात आलं आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मराठा समाजाची मागणी आहे. यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी महाराष्ट्रभर दौरे करुन जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. राज्यातील सर्वांत मोठा बहुसंख्य समाज असूनसुद्धा या समाजातील असंख्य युवक रोजगारापासून लांब राहिलेले आहेत. यामुळे मराठा समाज आर्थिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या खूपच मागे राहिलेला आहे.
जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. मात्र, सरकारला त्या तारखेची आठवण रहावी यासाठी एक डिसेंबरपासून गावोगावी साखळी उपोषण सुरु करा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं होत. त्यानुसार आज पासून राज्यात ठिकठिकाणी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत आज कराड शहरात साखळी उपोषणाची सुरुवात दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आहे. याशिवाय तालुक्यातील सैदापूर, खोडशी, मलकापूर परिसरासह तालुक्यातील अनेक गावांत देखील साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.