नवी दिल्ली : मान्सूनने यंदा ‘गूड न्यूज’ दिली असून गेल्या १७ वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच नियोजित तारखेच्या आधीच केरळमध्ये तो पोहोचणार आहे. केरळ किनारपट्टीवर मान्सून २७ मे रोजी दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून सध्या मान्सून निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. याशिवाय दक्षिण अंदमान समुद्र, पूर्व बंगालच्या उपसागरातील काही भागात मान्सून पोहोचला आहे. महाराष्ट्रात ६ जूनपर्यंत मान्सून पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
नैर्ऋत्य मोसमी वारे माले, बंगालचा उपसागर, निकोबार बेटांवरून जात असून १५ किंवा १६ मेपर्यंत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. यानंतर मान्सून दक्षिण अरबी समुद्रात पुढे जाईल. त्यानंतर श्रीलंकेचा काही भाग आणि दक्षिण बंगाल उपसागरासह अंदमान बेटांवर पोहोचेल, असे हवामान खात्याने सांगितले.
राज्यात मुसळधार
येत्या दोन दिवसात देशातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. महाराष्ट्रात १४ मेपर्यंत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय मध्य प्रदेश, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूतही जोरदार पावसाची शक्यता आहे.
मुंबईत पावसाचा यलो ॲॅलर्ट
भारतीय हवामान खात्याने मुंबईत मंगळवारी पावसाचा यलो ॲॅलर्ट दिला आहे. मुंबई व परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
मान्सून पाच दिवस आधी
गेल्या पाच वर्षात मान्सूनचे प्रत्यक्ष आगमन हे अंदाजाच्या तारखेनंतर चार दिवसांनी किंवा त्याआधी एक-दोन दिवस अशा फरकाने झाले आहे. मात्र, यावेळी पाच दिवस आधीच मान्सून केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने केली आहे. साधारणपणे १ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचतो. पण यावेळी २७ मे रोजी पोहोचण्याची शक्यता आहे.