मुंबई : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ६९ नागरिकांनी शनिवारी रात्री उशिरा कोदारी इमिग्रेशन सेंटरमार्गे चीन-नेपाळ सीमा ओलांडून नेपाळमध्ये प्रवेश केला. राज्य सरकारच्या माहितीनुसार, हे नागरिक सोामवारी ३१ ऑगस्टपर्यंत मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. राज्य आपत्कालीन संचालन केंद्राने आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या महाराष्ट्रातील ४०४ नागरिकांची माहिती नोंदवली आहे. यापैकी राज्यातील २६२ पर्यटक अद्याप नेपाळ किंवा चीनमध्ये अडकले होते. आता ६९ नागरिकांची सुखरूप सुटका झाल्याने आतापर्यंत राज्य सरकारने १४२ नागरिकांना परत आणण्याची व्यवस्था केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्रिय पाठपुराव्याखाली आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य सुरू आहे. आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक आणि पर्यटकांना मदत करण्यासाठी तसेच त्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी समन्वय साधत आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल आणि संचालक भालचंद्र चव्हाण हे सुरू असलेल्या बचावकार्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्र राज्य आपत्कालीन संचालन केंद्र हेल्पलाइन क्रमांक १०७० असा आहे.