पुणे : पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित उद्योजक केतन अग्रवाल यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी एक अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप विवाह केला असल्याचा दावा पोलिसांनी केला असून, त्यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्ड आणि लोकेशनच्या सखोल तपासातून हे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
आरोपींनी कुटुंबीयांपासून हा विवाह लपवून ठेवला होता, परंतु काही नातेवाईकांना याची कुणकुण असावी असा संशय पोलिसांना आहे. या दोघांना पुण्यात न राहता राजस्थानमधील उदयपूर किंवा जोधपूर येथे कायमचे स्थायिक व्हायचे होते. केतनसोबत नोव्हेंबर २०२६ मध्ये होणारे लग्न टाळण्यासाठी सियाने प्री-वेडिंग फोटोशूटसाठी बालीला जाणे किंवा वाढदिवसानिमित्त महाबळेश्वरची ट्रीप यांसारखे कार्यक्रम मुद्दाम टाळले होते, अगदी केतनचा पासपोर्टही तिने स्वतःकडे लपवून ठेवला होता.
केतनची हत्या करण्यासाठी आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध कट रचला होता. कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी त्यांनी विविध वेब सीरिज, पॉडकास्ट आणि गाजलेल्या गुन्ह्यांच्या व्हिडीओंचा अभ्यास केला होता.
आणखी काही गुपिते उघड होण्याची शक्यता
जानेवारी महिन्यापासून हत्येच्या दिवसापर्यंत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल २००४ वेळा फोनवर बोलणे झाले होते, ज्याचा कालावधी ३३८ तासांहून अधिक होता. चेतन चौधरी हा हुडी घालून त्यांच्या मागावर होता. दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून, फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील आणखी काही गुपिते उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.