पुणे : मोशी येथील कचरा डेपोमध्ये 'वेस्ट-टू-एनर्जी' प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेच्या ठिकाणी सुरू असलेल्या बचावकार्याला शनिवारी मोठी गती मिळाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ७ कर्मचाऱ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाईकांची प्रचंड अगतिकता आक्रोशाच्या स्वरूपात समोर आली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी अशा सर्वांच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हलगर्जीपणामुळेच आमची माणसं मोशी मेली, असा आरोप नातेवाईकांनी केला. येथील कचरा डेपो मध्ये कार्यरत असणाऱ्या 'वेस्ट टू एनर्जी प्रकल्पा' च्या इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड मोठा ढीग कोसळला. या ठिकाणी साधारण २० कर्मचारी कार्यरत होते, असा अंदाज पालिकेने सांगितला होता. त्यानंतर नऊ कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र इतर कर्मचारी त्या इमारतीच्या स्ट्रक्चर खाली गाडले गेले होते. त्यांना शोधण्यासाठी गेल्या बुधवारपासून एनडीआरएफ, लष्कर, अग्निशमन दल आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध यंत्रणांकडून येथे अथक शोधमोहीम राबवली जात आहे.
कचऱ्याचा प्रचंड ढिगारा, विषारी वायू आणि कोसळलेल्या इमारतीचे कठीण काँक्रिट यांचे मोठे आव्हान असतानाही बचाव पथकाने दिवसभरात मोलाची कामगिरी केली. ११ जुलै रोजी दुपारपासून रात्रीपर्यंत काळजीपूर्वक मोहीम राबवून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अड ६ मृतदेहांचा शोध घेण्यात आला.
दुर्घटनाग्रस्त इमारतीचा कठीण काँक्रिटचा भाग फोडण्यासाठी घटनास्थळी आणखी एक अत्याधुनिक 'डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशीन' आणण्यात आले असून, युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात आली.
या बचाव मोहिमेत आज दुपारी सर्वात आधी अक्षय सावंत आढळून आले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी सुनील कोरके यांचा मृतदेह बाहेर काढला. सायंकाळी ६ वाजता मोशी येथील गंधर्वनगरीत राहणारे सन्नी माने (वय ३९) यांचा शोध लागला. यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सायंकाळी छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असलेले महेश कुंभार आणि सायंकाळी मोशी येथील संजय गांधी नगरचे रहिवासी असलेले नागेश गायकवाड यांचा मृतदेह ढिगाऱ्याबाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर रात्री रणजीत पाटील यांना बाहेर काढण्यात आले. अत्याधुनिक 'डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशीन' च्या साहाय्याने काँक्रिटचे अडथळे वेगाने दूर केले जात असून, त्यामुळे बचावकार्याला मोठा वेग आला आहे. दरम्यान, या दुर्घटनेत यापूर्वी भावेश वाणी या कर्मचाऱ्याचा मृतदेह सुरुवातीलाच हाती लागला होता.
मृतांच्या कुटुंबीयांना एकूण ४० लाख रुपयांची मदत
या दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी एकूण ४० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये हा प्रकल्प चालवणाऱ्या अँटोनी वेस्ट ग्रुपने २५ लाख रुपये, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून १० लाख रुपये आणि राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांच्या मदतीचा समावेश आहे. यासोबतच कुटुंबातील इच्छुक व्यक्तीला कंपनीत नोकरी आणि मृत व्यक्तीच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च कंपनी उचलणार आहे.
नागरिकांचा संताप
दुसरीकडे, प्रशासनाच्या संथ कारभारावर आणि अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. नातेवाईकांचा संयम आता सुटला असून त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. 'इमारतीला भेगा पडल्याचे फोटो प्रशासनाला देऊनही वेळीच उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत?' असा संतप्त सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.