मुंबई : पुणे-कल्याणीनगर येथे घडलेल्या पोर्शे कार अपघातातील आरोपी अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुणे पोलिसांनी केलेली अटकेची कारवाई बेकायदा आहे, असा दावा करत याचिकाकर्त्या शिवानी आणि विशाल अग्रवाल यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेची न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेत सुनावणी १३ फेब्रुवारी रोजी निश्चित केली आहे.
कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत कार चालून दोघांना चिरडले. या प्रकरणात पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे पालक असलेल्या शिवानी आणि विशाल अग्रवाल या दोघांना जुलै २०२३ मध्ये अटक केली होती. या दाम्पत्याने अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप पोलिसांनी केला. मात्र पोलिसांनी केलेले आरोप खोटे असून आपण कुठल्याही पुराव्यांमध्ये फेरफार केला नाही. उलट पोलिसांनी आपणाला नाहक गोवण्यासाठी केलेली अटकेची कारवाई बेकायदा आहे. या कारवाईमुळे आपल्या संवैधानिक हक्कांवर गदा आली असून आम्हाला सोडून देण्याचे आदेश पोलिसांना द्या, अशी विनंती अग्रवाल दाम्पत्याने केली आहे.