मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना येत्या ५ जुलैपासून मिळणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी दिली.
शेतकरी कर्जमाफीच्या योजनेतील अटीत बदल करण्याची आणि त्यात गठित करण्यात आलेली उपसमिती सकारात्मक निर्णय घेईल, याचा पुनरुच्चारही भरणे यांनी केला. विधानसभेत सन २०२६-२७ या वर्षातील कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, सार्वजनिक आरोग्य, महिला आणि बालविकास विभागाच्या पुरवणी मागण्या सोमवारी मंजूर करण्यात आल्या. तत्पूर्वी झालेल्या चर्चेला उत्तर देताना भरणे यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कधीपासून लाभ होईल याबाबत स्पष्टता दिली.
शेतकरी कर्जमाफी ३० जूनपूर्वी दिली जाईल, असे सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार पुरवणी मागणीत कर्जमाफीच्या रकमेची तरतूद केली आहे. आता मागण्या मंजूर झाल्यानंतर त्या स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे जातील. त्यामुळे ५ जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल.
३६,५८५ कोटी रुपयांची गरज
“सरकारच्या प्राथमिक अंदाजानुसार ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ होणार असून ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची रक्कम त्यासाठी लागणार आहे. कर्जमाफीच्या योजनेतील अटींमध्ये बदल करण्याची, त्यात सुधारणा करण्याची मागणी अनेक आमदारांनी चर्चेदरम्यान केली होती. त्याला उत्तर देताना भरणे यांनी आम्हालाही शेतकऱ्यांची काळजी आहे. आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत,” असे त्यांनी विरोधी पक्षांना सुनावले.