महाराष्ट्र

“निवडणूक चिन्हांच्या यादीतून पिपाणी वगळा, अन्यथा…” राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं निवडणूक आयोगाला पत्र

Suraj Sakunde

राष्ट्रवादी पक्षातील फूटीनंतर निवडणूक आयोगानं मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असल्याचा निकाल दिला, त्याचवेळी शरद पवारांच्या नेतृत्त्वाखालील पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव मिळालं. निवडणूक आयोगानं पक्षाचं मूळ घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिलं, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे नवं निवडणूक चिन्ह मिळालं होतं. परंतु 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हाशी साधर्म्य असलेलं ‘पिपाणी’ हे चिन्ह देखील अनेक अपक्ष उमेदवारांना मिळालं होतं. यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अनेक उमेदवारांना निवडणूकीत मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं.

चिन्हांतील गोंधळामुळे ‘पिपाणी’ चिन्हांवर लढणाऱ्या अपक्ष उमेदवारांना राज्यात लाखो मतं मिळाली. पिपाणी या चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत नावही ‘तुतारी’ असं आहे. चिन्ह आणि नाव यातील साधर्म्यामुळं शरद पवार गटाला मिळणारी अनेक मतं अपक्ष उमेदवारांना मिळाली, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षातील अनेक नेत्यांनी केला आहे. त्यामुळंच ‘पिपाणी’ हे चिन्ह निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं निवडणूक आयोगाकडे केली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं लढवलेल्या १० जागांपैकी ८ जागांवर विजय मिळवला. तर केवळ २ जागांवर पराभवाचा सामना करावा लागला. सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शशिकांत शिंदे यांचा ३२७७१मतांनी पराभव केला. पण या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला ३७०६२ मते मिळाली आणि त्यांचं चिन्ह पिपाणी हे होतं. त्यामुळं हे चिन्ह जर इथं नसतं, तर कदाचित शशिकांत शिंदे यांचा विजय झाला असता, असा दावा जयंत पाटील यांनी केला होता. याशिवाय इतर मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार विजयी झाले असले, तरी तिथंही पिपाणी चिन्हावर लढणाऱ्या अपक्ष उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मतं पडली आहेत.

त्यामुळंच ‘पिपाणी’ हे चिन्ह निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात शरद पवार गटाने म्हटलं आहे की “पिपाणी या चिन्हामुळे आम्हाला फटका बसला. त्यामुळे तुम्ही आता या संदर्भात उचित निर्णय घ्या, अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ.”

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा