जळगाव : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत नाशिकमधील तिढा सुटल्यानंतर जळगावमधील राजकीय पेचही लवकरच सुटेल, असा विश्वास राज्याचे मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार गीते यांनी उमेदवारी मागे घेतल्याने तेथील प्रश्न निकाली निघाला असून, जळगावमधील तिढाही उद्यापर्यंत सुटेल, अशी अपेक्षा त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. महायुतीत नाशिकची जागा शिवसेनेला (शिंदे गट) मिळाल्यानंतर भाजपचे बंडखोर उमेदवार गीते यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी गुरुवारी उमेदवारी मागे घेत शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. दुसरीकडे, जळगावमध्ये जागा भाजपच्या वाट्याला आली असतानाही शिवसेनेच्या (शिंदे गट) नगरसेविका रेश्मा काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून महायुतीसमोर पेच निर्माण केला आहे.
रेश्मा काळे यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असले, तरी त्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक पातळीवर त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी ही भाजपसाठी चिंतेची बाब ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, गिरीश महाजन गुरुवारी जळगाव दौऱ्यावर आले असता खासदार, आमदार, भाजप पदाधिकारी तसेच शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांची एका हॉटेलमध्ये बैठक झाली. दरम्यान, आपल्या मुलाला उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा असलेल्या मंत्री गुलाबराव पाटील यांची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगावमधील तिढा सोडविण्यासाठी त्यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले असून, महायुतीतील पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
नाशिकचा प्रश्न सुटल्यानंतर जळगावमध्ये रेश्मा काळे यांनी माघार घेण्यास कोणतीही अडचण नाही. आज मंत्री गुलाबराव पाटील जळगावात नसल्यामुळे उद्या यासंदर्भातील निर्णय जाहीर होईल. रेश्मा काळे यांच्या माघारीबाबत आम्ही आशावादी आहोत. अपक्ष उमेदवार अनिल चौधरी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे हे देखील संपर्कात असून, ते महायुतीला पाठिंबा देऊ शकतात.गिरीश महाजन, आमदार भाजप