पुणे : आषाढी पायी वारीसाठी संत तुकाराम महाराज यांची पालखी ७ जुलै रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. १८ दिवसांचा प्रवास पूर्ण करून पालखी सोहळा २४ जुलै रोजी पंढरपूर येथे दाखल होणार असून यंदा या पालखी सोहळ्याचे ३४१ वे वर्ष आहे. याबाबतची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थान यांनी दिली.
पालखीचे प्रस्थान ७ जुलै रोजी होणार असून पहिला मुक्काम देहू येथील इनामदार वाड्यात असेल. ८ जुलै रोजी पालखी इनामदार वाड्यातून प्रस्थान केल्यानंतर पहिल्या अभंग आरतीसाठी अनगडशहा बाबा दर्गा परिसरात, तर दुसऱ्या अभंग आरतीसाठी चिंचोली येथील पादुका मंदिरात थांबेल. त्यानंतर संध्याकाळी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असेल.
यानंतर ९ व १० जुलै रोजी पुण्यातील नाना पेठ येथे मुक्काम होणार आहे. ११ जुलै रोजी लोणी काळभोर, १२ जुलै रोजी यवत, १३ जुलै रोजी वरवंड, १४ जुलै रोजी उंडवडी गवळ्याची आणि १५ जुलै रोजी बारामती येथील शारदा प्रांगणात पालखी मुक्कामी असेल.
१६ जुलै रोजी काटेवाडी येथे मेंढ्याचे रिंगण पार पडून सणसर पालखी तळावर मुक्काम होईल. १७ जुलै रोजी बेलवाडी येथे पहिले गोल रिंगण झाल्यानंतर पालखी निमगाव केतकी येथे मुक्कामी असेल. १८ जुलै रोजी इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण होऊन पालखी तळावर मुक्काम होईल. १९ जुलै रोजी सराटी, २० जुलै रोजी निरा स्नानानंतर अकलूज माने येथे तिसरे गोल रिंगण पार पडेल आणि पालखी तळावर मुक्काम असेल.
२१ जुलै रोजी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण झाल्यानंतर बोरगाव येथे मुक्काम होईल. २२ जुलै रोजी पिराची कुरोली, तर २३ जुलै रोजी बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण पार पडून वाखरी पालखी तळावर मुक्काम असेल. २४ जुलै रोजी पादुकांजवळ आरती आणि तिसरे उभे रिंगण झाल्यानंतर पालखीचे पंढरपूर येथे आगमन होईल. २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा करण्यात येणार आहे.यंदाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातील लाखो वारकरी सहभागी होणार असून पालखी मार्गावरील सर्व तयारीला वेग आला आहे.
पालखीचा परतीचा प्रवास
आषाढी एकादशीनंतर पालखी २८ जुलैपर्यंत पंढरपुरात विसावेल. त्यानंतर २९ जुलै रोजी वाखरी, ३० जुलै रोजी म्हाळुंगे माकडाचे येथील श्री विठ्ठल मंदिर, ३१ जुलै रोजी वडापुरी, १ ऑगस्ट रोजी लासुर्णे, २ ऑगस्ट रोजी बऱ्हाणपूर, ३ ऑगस्ट रोजी हिंगणीगाडा, ४ ऑगस्ट रोजी वरवंड, ५ ऑगस्ट रोजी कुंजीरवाडी फाटा, ६ व ७ ऑगस्ट रोजी पुण्यातील नवी पेठ, ८ ऑगस्ट रोजी पिंपरीगाव येथे मुक्काम करीत ९ ऑगस्ट रोजी पालखी सोहळा पुन्हा देहूत दाखल होणार आहे.