कराड : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुणे-सातारा मार्गावरील शिरवळ गावच्या हद्दीत सोमवार-मंगळवारदरम्यान मध्यरात्री झालेल्या भीषण कार अपघातात पुणे जिल्ह्यातील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये वेदांत अर्जुन वारिंगे (१९), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (१९), आदित्य बाळासाहेब गरुड (१९) आणि निखील बाळू राऊत (२०) यांचा समावेश आहे, तर दिक्षीत दयानंद पुजारी (२०) आणि कारचालक मयुर हनुमंत शिंदे (२०) हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सहा युवक सोमवारी रात्री सुमारे कारने पावसाळी पर्यटनासाठी पुण्याहून महाबळेश्वरकडे निघाले होते. मध्यरात्री सुमारे १ वाजता शिरवळ गावच्या हद्दीत एका हॉटेलसमोर कार आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार महामार्गाच्या दुभाजकाला धडकून तीन ते चार वेळा पलटी झाली आणि विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवरून येणाऱ्या आयशर मालट्रकवर जोरदार आदळली.
या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमधील मृतदेह आणि जखमी वाहनात अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी शिरवळ रेस्क्यू टीम आणि स्थानिक नागरिकांना तब्बल तीन तासांहून अधिक काळ प्रयत्न करावे लागले. घटनेची माहिती मिळताच फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे, शिरवळचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे आणि सारोळा महामार्ग मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत पडळकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.