मालवण : ‘ज्या गद्दारांनी आपले सरकार पाडले, मी त्यांच्या नाकावर टिच्चून पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणारच,' अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी येथे केली.
मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर झालेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, येत्या लोकसभा निवडणुकीत मी भाजपला दाखवून देईन की तुम्ही भगव्यात छेद करण्याचे पाप केले आहे. छत्रपतींच्या भगव्याला लाखो वर्षांची परंपरा आहे. त्या भगव्याला तुम्ही डाग लावलात. तुम्हाला आता छत्रपती शिवरायांचा खरा भगवा काय असतो तो लाल किल्ल्यावर मी पुन्हा फडकवून दाखवतो. त्यांचे बोगस फडके पुन्हा फडकू द्यायचे नाही, असा टोला त्यांनी लगावला.
ते म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी आरमाराची स्थापना केली. त्याच्या आठवणीत इथे महाराजांचा पुतळा उभारला. त्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान इथे आले. महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, पण त्यांचा महाराष्ट्र लुटणाऱ्यांनीच इथे त्यांचा पुतळा स्थापन केला. आता निवडणुका आहेत. त्यावेळी निवडणुका नव्हत्या. मुख्यमंत्री करणार अफजलखान भेटीला आला तेव्हा ईव्हीएम नव्हती. त्याने मगरमिठी मारत पाठीवर वार केला, मी जर लेच्यापेच्यासारखा गेलो असतो, तर काय झालं असतं. समोर शत्रू कितीही बलाढ्य असू देत, तयारीनिशी गेलात आणि मनाची जिद्द असेल…, तर भवानी तलवार पेलायला मनगट पाहिजे, जरूर. पण तलवार चालवण्यासाठी खंबीर मन पाहिजे, ते खंबीर मन तुझ्याकडे आहे की नाही? मला वाटलं शिवाजी महाराज मला तेच विचारताहेत, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
आता आक्रमक दिल्लीहून येताहेत. त्यांना महाराष्ट्राचे पाणी काय असते, ते पाजायची लायकी नसली तरी दाखवण्याची नक्कीच गरज आहे. सध्याचे सत्ताधारी लोक महाराजांपासून काय शिकले, काहीही शिकलेले नाहीत. महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, त्या महाराजांचा महाराष्ट्र लुटणारे महाराजांचा पुतळा स्थापन करून गेले. आम्ही महाराजांच्या शौर्याचा एक अंश, तेजाचा अंश जरी घेतला तरी आपण या हुकूमशाहीला गाडू शकतो, इतकी ताकद त्या अंशात आहे, असे ते म्हणाले.