रामभाऊ जगताप /कराड
पहलगाम हल्ल्याचा बदला एअर स्ट्राईक करून घेतल्यानंतर भारत व पाकिस्तान देशातील वातावरण तंग झाले आहे. या पार्श्वभूमीवर युद्धसदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सुट्टीवर गावी आलेल्या भारतीय सेनेतील विविध विभागांतील जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून सैनिकांच्या कुटुंबियांची परिस्थिती 'ए जाते हुए लम्हो..जरा ठहरो, जरा ठहरो', अशी भावूक बनली आहे.
भारतीय सैन्य दलात सातारा जिल्ह्यात शेकडो जवान कर्तव्य बजावत आहेत. साताऱ्याजवळील मिल्ट्री अपशिंगे सारख्या गावात तर घरटी जवान देशसेवा बजावत आहेत.
काश्मिरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दशतवाद्यांनी भ्याड हल्ला केल्यानंतर भारत देशात अस्वस्थता पसरली आहे. अखेर १३ दिवसानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळ अड्ड्यांवर हवाई हल्ले करून १०० दहशतवादी मारले. भारताने घेतलेल्या या बदल्याचा केवळ आपल्या देशानेच नव्हे तर संपूर्ण जगाने या कारवाईचे स्वागत केले. गेली दोन दिवस सातारा जिल्ह्यातील जवानही त्या त्या ठिकाणी हजर होण्यासाठी निघाले आहेत.
जवान पत्नींना सर्वाधिक वियोग...
देशकर्तव्यावर असणारा आपला पती कधी घरी येईल याकडे जवान पत्नी अक्षरश: डोळे लावून बसतात. आताच्या परिस्थितीमध्ये सुट्टीवर असतानाही आपत्कालीन परिस्थितीमुळे अर्धवट सुट्टी भोगून जवानांना जावे लागत आहे. यामुळे जवान पत्नींना सर्वाधिक वियोगाला सामोरे जावे लागत आहे. एसटीला बसवताना, रेल्वेला बसवताना सर्वच कुटुंबीयांचे डोळे पानावत आहेत. 'देशाला वाचवा.. स्वत:ही सुरक्षित राहा,' अशी भावना जवानांप्रति समाजाची झाली आहे.
सोमवारी लग्न लागले अन गुरुवारी सीमेवर
विजय पाठक/जळगाव : वैयक्तिक जीवनापेक्षा राष्ट्रीय कर्तव्य हे नेहमी महत्त्वाचे असते. याचा प्रत्यय परत एकदा आला.पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथील मनोज ज्ञानेश्वर पाटील या सैन्यात असलेल्या जवानाचे सोमवारी लग्न झाले मंगळवारी युद्धजन्य परिस्थितीत त्यास हेडक्वार्टरला तात्काळ हजर होण्याचा आदेश मिळाला आणि आदेश येताच तो गुरुवारी देश सेवेसाठी रवाना झाला. पाचोरा रेल्वे स्थानकावर त्यास निरोप देण्यास नवविवाहीत पत्नीसह नागरिक उपस्थित होते. माझ्या कुंकवाला मी देशाच्या रक्षणासाठी पाठवत असल्याचे नवविवाहिता यामिनी पाटीलने निरोप देतांना सांगितले. पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथील मनोज ज्ञानेश्वर पाटील हा तरूण भारतीय लष्करात जवान आहे.