जळगाव जिल्ह्यातील परांडा येथून विचित्र रेल्वे दुर्घटनेची मोठी बातमी समोर येत आहे. पाचोरानजीक येथून पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी रेल्वेत आग लागल्याच्या भीतीने थेट रूळावर उड्या मारल्या त्याचवेळी तेथून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवले, अशी माहिती घटनास्थळावरून मिळत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, 8 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर 30 ते 40 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच मृतांचा आकडा वाढू शकतो. तर पुष्पक एक्सप्रेसमध्ये खरोखर आग लागली होती की आग लागल्याची अफवा पसरली होती, हे अद्याप निश्चितपणे समजलेले नाही.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, आपत्कालीन परिस्थितीत गाडी थांबवण्यासाठी असलेली साखळी ओढल्यानंतर रुळावर आलेल्या प्रवाशांना ट्रेनने चिरडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
घटनेनंतर तेथील स्थानिक प्रवाशांनी या विचित्र अपघाताचे व्हिडिओ तसेच फोटो आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर पोस्ट केले आहे.
रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल
दरम्यान, रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. व्हायरल व्हिडिओ आणि फोटोंमध्ये जखमी आणि मृत प्रवाशी दिसत आहेत. मध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील निला यांनी सांगितले की, भुसावळ मंडळ येथून एक अपघात मदत ट्रेन देखील घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे.
नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, "पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवासी ट्रॅकवर असताना त्यांना शेजारील ट्रॅकवर येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने धडक दिली. आम्ही घटनास्थळी आहोत आणि अतिरिक्त एसपी, एसपी, जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी त्यांच्या मार्गावर आहेत. आम्ही डीआरएम आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत. ताज्या माहितीनुसार, आठ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि अतिरिक्त बचाव व्हॅन आणि रेल्वे रुग्णवाहिका पाठवल्या जात आहेत." तसेच त्यांनी किमान आठ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आणि मृतांचा आकडा वाढू शकतो असेही सांगितले.
दरम्यान, अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ, एएनआयने एक्सवर पोस्ट केला आहे.
या घटनेबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी त्याच्या एक्स खात्यावर पोस्ट करत घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.
जळगाव जवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेत काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समजुन अतिशय दुःख झाले. सर्व मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आपल्या सहवेदना कळवतो तसेच सर्व जखमींना लवकर बरे वाटो, ही प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
या घटनेविषयी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरून याबाबत त्यांनी एक्स पोस्ट केली आहे.