''काही मोजक्या लोकांमुळे बीड बदनाम होत आहे. इथे गुंडगिरी बोकाळली आहे. ही गुंडगिरी संपलीच पाहिजे, त्यांना सत्ता आणि पैशांची मस्ती आहे ती उतरलीच पाहिजे, तानाजी सावंत यांचा मुलगा सापडतो मग बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकणातील सातवा आरोपी कसा मिळत नाही? आमचे फोन रोज टॅप करता मग कृष्णा आंधळे कसा सापडत नाही? त्याच्या फोनचा सीडीआर काढा, देशमुख कुटुंबाला न्याय मिळायलाच हवा'' अशा शब्दांत शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
सुप्रिया सुळे या आज बीड दौऱ्यावर आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह त्यांनी आज मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. देशमुख यांच्या आई, मुलगी आणि पत्नीचे त्यांनी सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, न्याय मिळायलाच हवा मग गुन्हेगार कोणीही असो, या मागणीवर जोर दिला. तसेच याविषयी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार, असेही त्या म्हणाल्या.
बीड प्रकरणी अमित शाह यांची घेतली भेट
यावेळी त्यांनी आपण काही दिवसांपूर्वीच बीडमधील प्रकरणांविषयी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगतिले. मात्र, या भेटीविषयी त्यांनी स्वतःहूनच फारशी चर्चा होऊ दिली नाही किंबहूना या भेटीचे फोटो पोस्ट केले नाहीत, असेही त्या म्हणाल्या. यावेळी योग्य ती कारवाई करण्याचा अमित शाह यांनी शब्द दिला आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.
आमचा फोन टॅप करता मग कृष्णा आंधळे का सापडत नाही?
यावेळी सुप्रिया सुळे या सरकारवर चांगल्याच संतापल्या. त्या म्हणाल्या, ''आमचे फोन रोज टॅप करता मग कृष्णा आंधळे तुम्हाला कसा सापडत नाही? तुम्हाला तानाजी सावंतांचा मुलगा सापडतो मात्र कृष्णा आंधळेला अजून का पकडता येत नाही? कृष्णा आंधळेच्या फोनचा सीडीआर काढा, फोन असा जातोच कसा? '' असे प्रश्न विचारत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री फडणवीसांनाही ऐकवले
''मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक सुसंकृत नेते आहेत. संतोष देशमुख कुटुंबीय फडणवीस यांना भेटले तेव्हा आठ दिवसात त्यांना न्याय मिळेल असं मला वाटलं होतं. खरं तर अशा घटना घडल्यानंतर फडणवीस यांनी राज्यात अशा प्रकारच्या कृती चालणार नाही, हे खपवून घेतलं जाणार नाही, असा कडक संकेत पोलिसांना द्यायला हवा होता. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज तसेच शाहू-फुले-आंबेडकर यांच्या संस्कारानेच चालेल, असा संदेश द्यायला हवा होता. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. माझ्या या भावाला न्याय मिळावा यासाठी आता मी त्यांच्यासमोर पदर पसरणार आहे,'' असे त्या म्हणाल्या.
महिलांनो लाटणं हातात घ्या
यावेळी बीडच्या महिलांना त्या म्हणाल्या की, ''महिलांनो आता न्यायासाठी तुमीच लढा द्या. लाटणं हातात घेऊन जमिनीवर उतरा. आंधळे दिसला की ठोकून काढा त्याला,'' असे त्या म्हणाल्या.