मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र बहिणींचा शोध घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत ‘ई केवायसी’ करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार राज्यातील २ कोटी ४७ लाख महिलांपैकी ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील १ कोटी ८० लाख महिलांनी ‘ई केवायसी’ प्रक्रिया पूर्ण केल्याचे महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, ‘ई केवायसी’ प्रक्रिया पूर्ण न केल्याने ६७ लाख महिला अपात्र ठरणार आहेत. दरम्यान, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचा हप्ता पात्र महिलांना देणे बाकी असून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरअखेरीस बँक खात्यात जमा करण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून २०२४ मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर महिलांनी अर्ज करण्यास सुरुवात केली आणि तब्बल २ कोटी ६२ लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केले. मात्र, महिलांची प्रचंड संख्या लक्षात घेता राज्य सरकारच्या तिजोरीवर भार येऊ लागला. त्यानंतर पात्र महिलांकडे चारचाकी वाहन, सरकारी सेवेत असताना योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास येताच १० लाख महिला अपात्र ठरल्या. तर ५ लाखांहून अधिक महिलांचे आधार कार्ड तांत्रिक कारणामुळे बँकेशी लिंक होऊ शकलेले नाही. त्यामुळे सद्यस्थितीत २ कोटी ४७ लाख महिला पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या योजनेचा राज्याच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५पर्यंत ‘ई केवायसी’ करणे बंधनकारक करण्यात आले होते. ३१ डिसेंबरपर्यंत १ कोटी ८० लाख महिलांनी ‘ई केवायसी’ प्रक्रिया पूर्ण केली आहे, तर ६७ लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत.