रविवारी झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात जळगाव जिल्ह्याला तीन, तर धुळे जिल्हयाला एक मंत्रीपद मिळाले असले तरी नंदुरबार जिल्ह्याला मात्र एकही मंत्रीपद मिळालेले नाही. नंदुरबारच्या विजयकुमार गावित यांना पक्षाच्या नाराजीमुळे मंत्रीपद गमवावे लागल्याचे बोलले जाते.
जळगाव जिल्ह्यात महायुतीने सर्व म्हणजे अकराही जागा जिंकल्या आहेत.त्यामुळे २०१४ आणि २०२२च्या मंत्रीमंडळात असलेले भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांना पुन्हा स्थान मिळाले आहे. या बरोबरच चौथ्यांदा निवडून आलेले संजय सावकारे यांना मंत्रीपदाची संधी मिळाली. उत्तर महाराष्ट्रातून ४० जागा जिंकून आणण्यात गिरीश महाजन यांचा मोठा वाटा आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेले शिंदे सेनेतील गुलाबराव पाटील हे अत्यंत आक्रमक आणि टीकाकारांवर परखडपणे बोलणारे असून मुलूख मैदान तोफ म्हणून प्रसिद्ध आहेत. जिल्ह्यात शिंदे सेनेचे पाचही उमेदवार निवडून आणण्यात गुलाबरावांचा मोठा वाटा आहे. भुसावळ मतदारसंघातून निवडून आलेले संजय सावकारे हे प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांना एकनाथ खडसे यांनी भाजपात आणले. अत्यंत शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले संजय सावकारे यांनी पूर्वी राज्यमंत्री म्हणूनही काम केले असून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. धुळे जिल्ह्यात गेली पाच वर्षे मंत्रीपद नव्हते. त्यामुळे धुळे जिल्ह्यात नाराजी होती. ही नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर केली असून जयकुमार रावल यांना मंत्रीपदाची संधी दिली. नंदुरबार जिल्ह्यावर विजयकुमार गावीत यांचे एकेकाळी वर्चस्व होते. मात्र लोकसभा निवडणुकीत ते आदिवासी मतदारांवर प्रभाव टाकण्यात कमी पडले.