मुंबई : नाशिक जिल्ह्यातील इंजिनिअरिंग विद्यार्थी विपिन बाफना याच्या २०१३ मधील बहुचर्चित अपहरण आणि हत्या प्रकरणातील दोन आरोपींची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली. न्या. भारती डांगरे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा गुन्हा 'दुर्मिळातील दुर्मिळ' या वर्गवारीत मोडत नसल्याचे स्पष्ट केले. याचवेळी आरोपी चेतन पगारे आणि अमन जाट यांची फाशी ३० वर्षांच्या सक्तमजुरीत बदलली.
८ जून २०१३ रोजी विपिन हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी नृत्याच्या वर्गाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडला, पण परतला नाही. रात्री ११.३० वाजता त्याच्याकडून कुटुंबीयांना एक फोन आला, त्यात त्याने आपण मित्राच्या घरी रात्री थांबणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी परतणार असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळीही विपिन परत न आल्याने कुटुंबीयांनी चालकाशी संपर्क साधला. तेव्हा डान्स क्लास त्यांना ८ जूनला विपिन क्लासला आलाच नव्हता, असे लक्षात आले.
त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. तपासामध्ये चेतन पगारे आणि अमन जाट यांनी विपिनचे अपहरण करून त्याच्या कुटुंबीयांकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे समोर आले. खंडणी न मिळाल्याने त्यांनी विपिनची निघृण हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला होता.
विस्तृत निकालानंतर निर्णय
या प्रकरणी डिसेंबर २०२२ मध्ये नाशिकच्या विशेष न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. नाशिक सत्र न्यायालयाच्या या फाशीच्या निर्णयाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर ७१ पानांचा विस्तृत निकाल देत उच्च न्यायालयाने फाशी चा निर्णय रद्द करून आरोपींना ३० वर्षे तुरुंगातच ठेवण्याचे आदेश दिले आहेत.